बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय!


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सगळ्यांचे लक्ष पुढील निर्णयांकडे लागले आहे. या ऐतिहासिक विजयाची धुरा सांभाळणाऱ्या भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. तावडे म्हणाले की, बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय एनडीएचे पाच घटक पक्ष एकत्र बसून घेतील.


विनोद तावडे यांनी स्पष्ट केले की, भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रात कधीही मुख्यमंत्र्यांचा चेहरा आधी जाहीर केला नव्हता. बिहारच्या निवडणुकीतही हीच रणनीती कायम होती. विशेष म्हणजे, विरोधकांकडून नितीशकुमार आजारी असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात प्रचार करण्याचा डाव होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वीच 'बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची कोणतीही वॅकन्सी नाही,' असे स्पष्ट करून विरोधकांच्या या खेळीला प्रभावीपणे निष्प्रभ केले होते, असे तावडे म्हणाले.


आकडेवारी काय सांगते? हा विकास आणि समन्वयाचा विजय


या निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भाजपला ९४, जदयू (जेडीयू) ला ८४, राष्ट्रीय जनता दलला २५, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) ला १९, एमआयएमला ६, राष्ट्रीय लोक मोर्चाला ४, हम पार्टीला ५ आणि काँग्रेसला २ जागांवर आघाडी मिळाली आहे. तसेच, सीपीआय २ जागांवर पुढे आहे. विनोद तावडे यांनी या विजयाचे श्रेय विकासाला, तसेच मित्रपक्षांमधील उत्तम संवाद आणि समन्वयाला दिले.


नितीशकुमारांचे पुनरागमन आणि 'टीम बिहार'ची मेहनत


तावडे यांनी या विजयामागची भूमिका अधिक स्पष्ट केली. नितीशकुमार यांनी भाजप सरकार सोडून जेव्हा लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा केंद्रीय नेतृत्त्वाने बिहार हे 'महत्त्वाचे राज्य' असल्याचे सांगून तावडेंना विशेष लक्ष देण्यास सांगितले होते. 'बिहार हे राजकारणासाठी खूप अवघड राज्य आहे,' अशी कबुली देत तावडे म्हणाले की, त्यांनी नितीशकुमार यांनी युती का सोडली, याचा अभ्यास केला. 'इंडी' आघाडीने त्यांची केलेली फसवणूक आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एनडीएमध्ये परत आणण्याचा पक्षाने प्रयत्न केला. 'टीम म्हणून आम्ही काम केले आणि बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन विकासाला मतदान केले, हेच आमचे सर्वात मोठे यश आहे,' असे त्यांनी नमूद केले.


संवाद, समन्वय आणि यशस्वी टॅगलाईन


आघाडीच्या राजकारणात 'प्रामाणिक संवाद' खूप महत्त्वाचा असतो. जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांची पार्टी, आणि जीतनराम मांझी यांची हम पार्टी या सर्व मित्रपक्षांसोबत भाजपचा सातत्याने संवाद होता. हा संवाद लोकसभा निवडणूक आणि जागावाटप या दोन्ही वेळी उपयोगी पडला. तावडे यांनी सांगितले की, एनडीएने जिल्हावार बैठका आणि संमेलनं घेऊन कार्यकर्त्यांना एकत्र आणले. 'रफ्तार पकड चुका है बिहार' (बिहारने वेग पकडला आहे) ही टॅगलाईन एनडीएच्या विजयात महत्त्वाची ठरली. तावडे म्हणाले की, बिहारला जातीच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी विकासाचा मुद्दा महत्त्वाचा होता आणि ही टॅगलाईन विकासाची गती दर्शवते.


विरोधकांच्या टीकेला स्पष्ट उत्तर


भाजप मित्रपक्षांना संपवतो, ही विरोधकांची टीका तावडे यांनी साफ फेटाळून लावली. 'उत्तर प्रदेश असो, कर्नाटक असो किंवा आंध्र प्रदेश-तेलंगणा, जिथे युती आहे, तिथे मित्रपक्ष कायम आहेत,' असे तावडे यांनी ठामपणे सांगितले. तसेच, प्रशांत किशोर यांच्या टीकेला सुरुवातीपासूनच उत्तर द्यायचे नाही, हे ठरवले होते, त्यानुसार काम केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या