आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी दुर्घटना घडली. 'कावेरी ट्रॅव्हल्स'च्या खासगी स्लीपर कोच बसला एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात स्लीपर कोच बस असल्यामुळे बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. यावेळी दुचाकीची धडक बसच्या इंधन टाकीला लागली. त्यामुळे बसच्या इंधन टाकीपासून आग लागण्यास सुरुवात झाली. ही आग एवढी वेगात पसरली की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही. त्यात ज्या प्रवाशांना आगीचा अंदाज आला त्यांनी आपत्कालीन दरवाजा उघडून बसबाहेर उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवर कर्नूल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या ...
या दुर्घटनेबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या अधिकृत खात्यावर पोस्ट करत सांगितले की, "चिन्ना टेकुरजवळ झालेल्या बस अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत."
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत २० जणांनी जीव गमावला होता. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.