मुंबई: कफ परेड येथील मच्छीमार नगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग विझवली, पण या घटनेमुळे परिसरात खळबळ
उडाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मच्छीमार नगर येथील एका चाळीमध्ये पहाटे ४ वाजता ही दुर्घटना घडली. चाळीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. इलेक्ट्रिक वाहनांच्या तीन बॅटरी, वीज जोडणी, वायरिंग आणि घरातील वस्तूंपर्यंत ही आग पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि बेस्टचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करून आगीच्या विळख्यातून चार जणांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १५ वर्षीय यश खोत या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये देवेंद्र चौधरी या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर विराज खोत,संग्राम कुर्णे या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.