काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा कहर आणि अतिवृष्टी अनुभवल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा धडकी भरवणारा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागांना, विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशांना, पुन्हा एकदा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, संपूर्ण कोकण आणि गोवा येथे पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात, लक्षद्वीपजवळ हवेची द्रोणीय स्थिती (Trough) निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या वादळी पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, ही द्रोणीय स्थिती १९ ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील या बदलामुळे कर्नाटक आणि केरळपर्यंत समांतर क्षेत्र निर्माण होणार असून, त्याचा थेट प्रभाव कोकण किनारपट्टीच्या भागात जाणवणार आहे. त्यामुळे, किनारपट्टीच्या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup) झालेल्या बालमृत्यूंच्या घटनेनंतर, आता ...
चिपळूणमध्ये सकाळपासून हलक्या सरी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराच्या हवामानात आता स्पष्टपणे बदल जाणवू लागले आहेत. आज सकाळपासूनच शहरात हलक्या सरींची सुरुवात झाली आहे. वातावरणातील या बदलांमुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या संभाव्य तीव्र पावसाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील बदलांमुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याने, जिल्ह्याच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोल्हार बुद्रुकमध्ये वीजपुरवठा खंडित
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक गावात आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दुसरीकडे, रायगड जिल्ह्यामध्येही अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी भातपिकाची कापणी केली आहे, त्या कापणी केलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. या अवकाळी आणि वादळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी अशा दोघांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान; मदतीनंतरही शेतकरी संकटात
राज्याच्या विविध भागांत पावसाची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. सध्या दक्षिण रायगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांचीही मोठी तारांबळ उडाली आहे. केवळ कोकण किनारपट्टीच नव्हे, तर राज्यातील इतरही अनेक भागांमध्ये पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असली तरी, अनेक भागांत पाऊस इतका जास्त झाला की, शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच वाहून गेली आहे. त्यामुळे जाहीर झालेली मदत तुटपुंजी ठरत असून, पुन्हा सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.