नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील स्वस्थपणे झोपू शकला नाही. कारण भारतीयांनी प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात संघर्ष करून त्यांना सडेतोड उत्तर दिले होते असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूरच्या भोसले घराण्यावरील 4 पुस्तकांचे डॉ. भागवत यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकाशन करण्यात आले. नागपूरच्या सिनिअर भोसला पॅलेस येथे आयोजित प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
यावेळी सरसंघचालक म्हणाले की, भारतात कधीही शौर्याची कमतरता कधीच नव्हती. पण, असे असूनही, देशावर सातत्याने परकीय हल्ले होतच राहिले. छत्रपती शिवराय हे या या परकीय आक्रमकांचा उपाय होते. शिवरायांनी आपल्यासोबत मित्र जोडून देव, देश आणि धर्मासाठी परकीय सत्तेशी संघर्ष केला. परिस्थिती कशीही असली तरी आपुलकीने माणसे जोडण्याची मनस्थिती आणि त्यामागची प्रेरणा जोवर होती तोवर आमचा इतिहास सरशीचा राहिला आहे. तसेच हे केवळ छत्रपती आणि त्यांनी निर्माण केलेल्या मराठा साम्राज्यापर्यंत मर्यादित राहिले नाही तर इतरही अनेक राजांनी त्यापासून प्रेरणा घेऊन संघर्षाला गती आणि बळ देण्याचे काम केले. राजस्थानमध्ये, दुर्गा प्रसाद राठोड यांनी राजपूतांना एकत्र करून संघर्ष केला. त्यानंतर मुघल पुन्हा कधीही राजपुतानात पाऊल ठेवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे कूचबिहारचा राजा चक्रधर सिंह यांच्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव होता. चक्रधर सिंहानी दुसऱ्या राजाला लिहीलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की, "आता, आपणही शिवाजी महाराजांप्रमाणे परदेशी आक्रमकांना बंगालच्या समुद्रात बुडवून त्यांचा नाश करू शकतो." असे सरसंघचालकांनी सांगितले.
व्यापक राष्ट्रहितासाठी स्वार्थाचा त्याग करून देश कार्यासाठी उभे राहण्याची तयारी ठेवावी लागते.
कान्होजी आंग्रे यांनी आपल्या वतनावर पाणी सोडून आपल्या 4 मुलांसह शिवाजी राजांना येऊन मिळाला होता. त्यामागे “राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” ही प्रेरणा होती. हिच प्रेरणा नागपूरकर भोसलेंनी देखील कायम ठेवली होती. अप्पासाहेब भोसलेंनी काबुल-कंधार पर्यंत संधानस साधून इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा हे त्याचेच द्योतक होते. नागपूरच्या भोसले राजघराण्याचा हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची गरज असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्रनाथ महाराज, पुस्तकांच्या लेखकांची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.