पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या रील्समध्ये पुणे शहराची संस्कृती आणि पुणेरी विनोद दाखवून एक मजबूत चाहता वर्ग निर्माण केला आहे, मात्र आता त्याच्यावर पुण्याचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि पुणेकरांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. कारण गणेशोत्सवापूर्वी त्याने शेयर केलेल्या एका व्हिडिओमुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तसेच काही ऑनलाईन धमक्या देखील मिळू लागल्यानंतर त्याचा मनस्ताप होऊन अखेर सुदामेने हा व्हिडिओ डिलीट करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर त्याला याबद्दल माफी देखील मागावी लागली आहे. नेमके काय आहे प्रकरण? सविस्तर माहिती घेऊया.
सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील बनवला होता. ज्यावर त्याला ऑनलाईन धमक्या आणि शिव्या देण्यात आल्या. यामुळे त्याने ती रील डिलीट करत, लोकांची माफी देखील मागितली.
अथर्व सुदामेची वादग्रस्त रील नेमकी कशाबद्दल आहे?
हिंदू मुस्लिम ऐक्यावर अथर्व सुदामेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक रील बनवली होती. ज्यामध्ये सुदामे गणेशोत्सवासाठी मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश मूर्ती कारखान्यात जातो. जिथे मूर्ती बनवणारा व्यक्ती हा एका मुस्लिम कुटुंबातील असल्याचे दाखवण्यात आले आहे. मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे त्या व्यक्तीकडूनच मूर्ती खरेदी करतो. या रीलमध्ये अथर्वच्या मुखात एक संवाद आहे, ज्यात तो मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही... तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील..." या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून प्रचंड टीका होत आहे. या रिलमधील संवाद चिथावणीखोर आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप टिकाकरांनी केला आहे.
टीकेनंतर, सुदामेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून रील हटवल्याचे वृत्त आहे. असे असले तरी या रिल्सच्या प्रती मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर प्रसारित होत आहेत. ज्याचा फटका म्हणजे, अनेक युजर्सने त्याला अनफॉलो देखील करण्यास सुरुवात केली आहे.
सुदामेने माफी मागितली
या वादग्रस्त रीलमुळे सुदामेवर चौफेर टीका झाली. त्यामुळे सुदामेने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्पष्टीकरणात्मक व्हिडिओदेखील अपलोड केला. यात त्याने त्याच्या फॉलोअर्सची माफी मागितली आणि आग्रह केला की त्याचा कधीही कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. त्याने असेही निदर्शनास आणून दिले की त्याने बहुतेक मराठी कंटेंट निर्मात्यांपेक्षा जास्त सांस्कृतिक आणि उत्सवांशी संबंधित रील्स तयार केल्या आहेत, ज्याद्वारे तो धार्मिक परंपरेचा आदर ठेवतो. शिवाय त्याने आदल्या दिवशीच वादग्रस्त रील्स स्वेच्छेने हटवल्या असल्याचे देखील यात म्हंटले आहे.
ब्राम्हण महासंघाची अथर्व सुदामेवर आगपाखड
सुदामेच्या रिलसंदर्भातल्या वादात ब्राह्मण महासंघाने देखील त्याला खडेबोल सुनावले. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी या विषयावर बोलताना सुदामेने केवळ मोनरंजन करावं, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये, असं सांगितलं आहे.