मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. लेखक-दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव आणि मानवी नात्यांचे भावनिक पदर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाची कथा एका सामान्य कुटुंबातील वडिल आणि त्याच्या मुलीच्या नात्यावर आधारित आहे. विशेष म्हणजे, ही गोष्ट एका नक्षलवाद्याच्या जीवनावर केंद्रित असून त्याच्या मुलीशी असलेल्या नात्याचा हळुवार बाजूने वेध घेतला आहे. हिंसेच्या मार्गाऐवजी शिक्षण व शांततेचा स्वीकार करणाऱ्या प्रवासाची ही कहाणी आहे.
एस. एस. स्टुडिओ आणि एक्सपो प्रेसेंट या बॅनरखाली शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत हृतीका पाटील, वीणा जगताप, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, अमोल खापरे आणि चेतन चावडा यांच्या भूमिका असतील. चित्रपटातील संगीत हे आदिवासी लोककलेवर आधारित असून, त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा आणि अस्सल अनुभव मिळेल.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा अशा लोकांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी हिंसेऐवजी शिक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारला. हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल, असा मला विश्वास आहे. यांची 'एक तिकीट, एक वृक्ष ' लावायची ही संकल्पना मला विशेष भावली.''
चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी सांगितले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चे पोस्टर अनावरण होणे हा आमच्या टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील सिनेमापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनापासून केलेला प्रयत्न आहे.” हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, ही आमची मनापासूनची इच्छा आहे.”