आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध
पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना अंतिम अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालघर पंचायत समितीच्या एका गणात आणि वाडा पंचायत समितीच्या एका गट आणि गणात केलेल्या बदलासह अंतिम अधिसूचना प्रसिद्धी करण्यात आली असून, सदर प्रभागरचनेनुसारच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिकेची प्रभागरचना करण्यात येत आहे. दरम्यान, ग्राम विकास विभागाच्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद पंचायत समित्यांची प्रभाग रचना करण्यात येणार असून, पालघर जिल्हा परिषदेसाठी एकूण ५७ जिल्हा परिषद गट आणि पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, मोखाडा आणि जव्हार या आठ पंचायत समित्यांच्या ११४ गणासाठी प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस फलकांवर आणि संकेतस्थळांवर प्रभागरचनेची प्रारूप अधिसूचना १४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप रचनेवर हरकती आणि सूचना संबंधित तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारल्या आल्या. विभागीय आयुक्तांनी हरकती आणि आक्षेपावर निर्णय दिल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी प्रभागरचना अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत देण्यात आलेल्या प्रक्रियेला मुदतवाढ देऊन २२ ऑगस्ट रोजी प्रभाग रचना अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली असून, विभागीय आयुक्तांच्या अंतिम निर्णयानंतर पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून पालघर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांची प्रभागरचना अंतिम अधिसूचना २२ ऑगस्ट रोजी शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गालतरे गटातील दोन गावे खानीवली गटात
वाडा पंचायत समिती कार्यक्षेत्रात येणाऱ्या गालतरे या जिल्हा परिषद गटातील व गोऱ्हे पंचायत समिती गणातील वसुरी बु. आणि आवंढे ही दोन गावे खानीवली जिल्हा परिषद गट आणि गणात असावी या बाबतचा आक्षेप मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करताना वसुरी बु. आणि आवंढे या दोन गावांना खानीवली या गट आणि गणात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पालघर पंचायत समिती गणातील सरावली हा गण सरावली अवधनगर ऐवजी सरावली धोडीपूजा असा राहणार असल्याबाबत प्रभागरचना अंतिम अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.