अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा
मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला मिळाला आहे. नागपूरच्या या बंगल्यात मी लोकांच्या तक्रारी, कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी खास स्टाफ नेमला आहे. त्या स्टाफने मला सांगितले आहे की, या कार्यालयात जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी येतच नाहीत. जे येतात त्यांच्या तक्रारी आम्ही ऐकून घेतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
जे तक्रारी घेऊन माझ्या बंगल्यातील कार्यालयात येतात, त्यांना माझा स्टाफ संबंधित कार्यालयात घेऊन जातो आणि तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतो. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवली पाहिजे. नाहीतर आमच्या आणि पक्षाच्या नावावर कोणी पदाधिकारी आपली दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे, असे अजित पवार म्हणाले.
सर्व तक्रारी १०० टक्के सोडवता येत नाहीत. माझ्या स्वभाव असा आहे, की जे न होणारे काम असतात त्याबद्दल मी लगेच सांगून देतो. विदर्भातील पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही मला कामाची यादी द्या. मी अधिकाऱ्यांना ती यादी देतो आणि सांगतो की यादीतील नावे असलेले कार्यकर्ते काम घेऊन आले तर ते काम अजित पवाराने सांगितले आहे असे समजून कार्यकर्त्यांचे काम करा, असे ते यावेळी म्हणाले.
सार्वजनिक हिताच्या कामाला प्राधान्य : तुम्ही काम केले म्हणून लोक मते देतात, हे समीकरण डोक्यातून काढून द्या. कोणत्या कामाला महत्त्व देतात हे लोक पाहत असतात. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षात होती. तरी त्यांच्या ३१ जागा निवडून आल्या आणि आम्ही सत्तेत होतो तरी आमच्या १७ जागा निवडून आल्याचे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांना सांगितलेला काम नियमात बसणारे असले पाहिजे. नियमाच्या बाहेरचे काम अधिकाऱ्यांवर दबाव आणला तरी तो कसे करणार? अधिकाऱ्याला सांगायचे काम तुमचे वैयक्तिक नसावे, तो सार्वजनिक हिताचे काम असावे असे अजित पवार म्हणाले.