मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या परिस्थितीचा विचार करून महापालिकेने आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. इतकंच नव्हे, तर खाजगी कार्यालयांनीही कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी, अशा सूचनाही महानगरपालिकेकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, काही अत्यावश्यक कारणास्तव कामकाज सुरू ठेवण्याची वेळ आलीच, तर संबंधित कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशा स्पष्ट सूचना महापालिकेने दिल्या आहेत. महानगरपालिकेचा हा निर्णय घेताना नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे, याला सर्वोच्च महत्त्व देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व कार्यालयांनी महापालिकेच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, असं आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.
सरकारी-खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर; रेड अलर्टचा इशारा
मुंबईकरांसाठी आजचा दिवस मुसळधार पावसामुळे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरे याठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. आज सकाळपासूनच शहरात पावसाचा जोर कायम असून, ठिकठिकाणी पाणी साचण्याची आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांना आज एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांना या निर्णयातून सूट देण्यात आली असून, त्या पूर्ववत सुरू राहणार आहेत. तसेच खासगी कार्यालये, कंपन्या आणि आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवासामुळे होणाऱ्या अडचणी टाळता येतील. महानगरपालिकेने मुंबईकरांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आणि शक्य तितकं घरात सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. मुसळधार पावसामुळे निचरा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घेणं गरजेचं असल्याचंही बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई: आज समुद्राला भरती असल्याकारणामुळे, पाऊसाचा जोर कायम राहिला तर मुंबईची तुंबई होण्यास वेळ लगणार नाही, याचा अंदाज घेत हवामान खात्याने कालच मुंबई ...
रेल्वे ट्रॅकवर पाणी; उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत
हवामान खात्याने मुंबईसाठी कालच रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार येत्या काही तासांत शहरात अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून, मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची दाटी झाल्याने वातावरणात अंधार दाटून आला आहे. दिवसाचा प्रकाश असूनही शहरात रात्रीसारखा अंधार पसरल्याचं चित्र दिसत आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसाचे पाणी रेल्वे ट्रॅकवरही घुसल्याने उपनगरी रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गैरसोयी टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिकेने मुंबईकरांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.
माटुंगा स्टेशनचा ट्रॅक पाण्याखाली, मध्य रेल्वेच्या गाड्या ४० मिनिटं उशिराने
सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेषतः माटुंगा रेल्वे स्थानकातील ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रेल्वेची नियमित वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी, मध्य रेल्वे मार्गावरील (Central Railway) गाड्या तब्बल २५ ते ४० मिनिटांच्या उशिराने धावत आहेत. याचबरोबर हार्बर मार्गावरील (Harbour Line) गाड्याही वेळेत धावू शकलेल्या नाहीत. या मार्गावरील लोकल गाड्या सुमारे अर्धा तास उशीरा धावत असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे, एरवी मुसळधार पावसाचा फारसा परिणाम न होणाऱ्या पश्चिम रेल्वेमार्गालाही (Western Railway) यावेळी फटका बसला आहे. या मार्गावरील गाड्या सरासरी १० ते १५ मिनिटं उशीरा धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने धीर धरावा, गर्दी टाळावी आणि शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांना सकाळपासूनच मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.