इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही
मुंबई : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे बसथांब्यावरील प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षा तसेच भाडेतत्त्वावर बसगाड्या पुरवणाऱ्या कंपन्यांकडून वेळेत गाड्या देण्यात केली जाणारी दिरंगाई या आणि अशा अन्य कारणांमुळे बसप्रवाशांना दररोज मनस्ताप होत असतानाच आता नव्याने दाखल झालेल्या ५१ इलेक्ट्रिक एसी बसगाड्यांनी आगारातच ‘बसकण’ मारली आहे. ओशिवरा आगारामध्ये चार्जिंग पॉइंटची सुविधाच नसल्याने या बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या या आगारातून ‘नॉन एसी’ बसगाड्याच विविध मार्गावर धावत आहेत.
सध्या बेस्ट उपक्रमाकडे एकूण दोन हजार ६८७ बसगाड्या आहेत. यापैकी ४१८ बसगाड्या बेस्टच्या मालकीच्या आहेत. बेस्टचा ताफा हा तीन हजारांच्या खाली आल्याने याचा परिणाम दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही झाला आहे. बसताफा कमी असल्याने प्रवाशांची बस थांब्यांवरील प्रतीक्षाही वाढली आहे. त्यातच अनेक ठिकाणी चाललेल्या रस्तेकामांमुळे अनेक बसमार्ग एकतर रद्द केले आहेत किंवा अन्य मार्गावर तरी वळवले आहेत. त्यातच बसगाड्यांचा ताफा कमी झाल्याने प्रवाशांना बसगाडीसाठी प्रतीक्षा करावी लागत असून वाहतुकीसाठी पर्यायी सेवांचा अवलंब करावा लागत आहे. त्याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवरही होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर अधिकाधिक प्रवाशांनी ‘बेस्ट’च्या बसगाड्यांमधून प्रवास करावा, यासाठी बेस्ट प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी, २३ मे २०२३ रोजी २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट बेस्ट उपक्रमाने निविदा प्रक्रिया राबवून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. मात्र आत्तापर्यंत यातील केवळ ६५० बसगाड्या दाखल झाल्या आहेत. बसगाड्या येण्याचे प्रमाणही कमी आहे.
या कंपनीपाठोपाठ फोटॉन कंपनीकडून १२ मीटर लांबीच्या २५० एसी सिंगल डेकर इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार होत्या. त्यापैकी ५१ एसी बसगाड्या १ ऑगस्टपूर्वीच 'बेस्ट च्या ओशिवरा आगारात दाखल झाल्या आहेत. या ई-बसगाड्या चार्ज करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक आगारात चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जाते, मात्र ओशिवरा आगारात ही सुविधाच नसल्याने या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावू शकत नाहीत.