Monday, August 4, 2025

कल्याणमध्ये कोकण वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आमरण उपोषण

कल्याणमध्ये कोकण वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आमरण उपोषण

चौदा वर्षे उलटूनही बाधित सदनिकाधारकांची फरफट थांबेना


कल्याण : सुमारे चौदा वर्षे उलटूनही कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहतीमधील नागरिकांची पुनर्विकास प्रकल्प पूर्ण न झाल्याने फरफट सुरू आहे. हा प्रकल्प रखडण्यास कारणीभूत असलेल्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आणि रहिवाशांना हक्काची घरे मिळावी यासाठी कल्याण पश्चिमचे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या बाधित नागरिकांसह कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण केले आहे.


कल्याण पश्चिमेतील बिर्ला काँलेज, परिसरात कोकण वसाहत माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास उत्पन्न गट, मध्यम वर्गीय, उत्पन्न गट, उच्चतम उत्पन्न गट या गटवारीनुसार लोकांनी म्हाडा अंतर्गत घरे ३५ वर्षांपूर्वी घेतली. सुमारे १४ वर्षांपूर्वी पुनर्विकासाच्या नावाखाली दोन वेगवेगळ्या विकासकांनी कोकण वसाहतीतील पुनर्वसन बाधित सदनिका धारकांना वाढीवक्षेत्रासह बहुमजली इमारतीत सदनिका, तसेच सदनिका पूर्ण होण्याच्या कालावधीपर्यंत घरभाडे देणार असे सांगितले होते. मात्र सुमारे १४ वर्षे होऊन देखील घरभाडे पण नाही घरदेखील नाही आणि आपली फरफट होत असून काहींना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकताना आपले हक्काचे घर मिळत नसल्याने घरभाडे भरण्याचा आर्थिक बोजा पडत आहे.


याबाबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शांतीदूत सोसायटी माध्यमातून म्हाडा पूनर्वसन प्रकल्पासंदर्भात प्रश्न विधानसभेत आमदार योगेश टिळेकर यांच्या माध्यामातून मांडत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यांना हक्काची घरे, न्याय मिळवून देण्यासाठी सुमारे १६०० पुनर्विकास प्रकल्प बाधित सदनिका धारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पोलीस उपायुक्त कार्यालयालगत आमरण उपोषण सुरू रविवारी सकाळपासून सुरू केले.


या उपोषणास प्रचंड प्रतिसाद लाभला असून समाजातील सर्वच वर्गातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. शनिवारी शिंदे गट शिवसेनेचे आमदार विश्वनाथन भोईर आणि भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार, यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला. यात विश्वनाथ भोईर यांनी बाधितांना घरे मिळवण्यासाठी आम्ही देखील नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न लावून धरला आहे. विकासकाला ४ महिन्यांची मिळालेल्या मुदतीची वाट पाहणे हे देखील महत्त्वाचे असून पुनर्वसन प्रकल्प बाधितांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सद्यस्थितीत आमरण उपोषण करणे योग्य नाही असा आरोप केला.


माजी आमदार पवार यांनी १४ वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे. बाधितांना घरे मिळत नाही. स्थानिक लोक प्रतिनिधी करतात काय? असा सवाल करत तुम्ही बाधितांच्या बाजूने की, विकासकाच्या बाजूने असा टोला लगावला. पुर्नविकास करणाऱ्या विकासकांनी प्रकल्प बाधितांना घरभाडे, घरे वेळेत देत नसल्याने गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील पवार यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment