मुंबई (प्रतिनिधी) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावर खड्डे खोदल्यास मंडळांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडपासाठी खड्डे खोदल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये खर्च आणि दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
पालिकेच्या या जाचक अटींना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने कडाडून विरोध केला आहे. मुंबई शहर व उपनगरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. अशा रस्त्यांवर खोदकाम करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे मुंबईत भर रस्त्यात मंडप घालून साजरा होणार्या गणेशोत्सवामध्ये खड्यांचे संकट आले आहे. रस्त्यावरील बाप्पाची मूर्ती बसवण्यासाठी तब्बल ३५ ते ४० फुटाचे मंडप घालण्यात येतो. त्यामुळे साहजिकच या मंडपासाठी भर रस्त्यात खड्डे खोदावे लागतात. नवीन सिमेंट काँक्रीट व अन्य रस्त्यावर गणेशोत्सवामध्ये मंडप बांधण्यासाठी खड्डे खोदल्यास मंडळांना एका खड्यासाठी तब्बल १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे मंडप बांधायचा कसा व मंडप बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांसाठी एवढा पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांना पडला आहे.
मुंबईतील गणेश उत्सवाची ही संस्कृती टिकवण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने मंडप उभारणीसह अन्य परवानग्यासाठी लागणार्या शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे. पण दुसऱ्या बाजूने महापालिका मंडळाकडून लाखो रुपये वसूल करत आहे. पूर्वी २ हजार रुपये प्रति खड्डा दंड वसूल केला जात होता. मात्र गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे खोदल्यामुळे रस्त्याची होणारी दुरवस्था लक्षात घेऊन, या दंडामध्ये १५ हजार रुपये प्रति खड्डा अशी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळांचे आर्थिक गणितच कोलमडून जाणार आहे. त्यामुळे वाढीव दंडाला गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे.
मंडळ दंड भरायला तयार आहेत मात्र एका खड्यासाठी १५ हजार रुपये दंड आकारल्यास दहा खड्यांसाठी तब्बल मंडळांना दीड लाख रुपये दंड भरावा लागेल. पैसा आणायचा कुठून असा सवाल मंडळांनी केला आहे.