नवी दिल्ली: मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी वर्षभरातून ३० दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल, आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल, तसेच तुम्हाला कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसेल, तर आता तुमची चिंता मिटली आहे. कारण आता केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत या निर्णयाची माहिती दिली.
डॉ. जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?
केंद्र सरकारचे कर्मचारी ३० दिवसांची अर्जित रजा घेऊ शकतात. ज्यामध्ये ते त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकतात तसेच त्यांची इतर अनेक वैयक्तिक कामे पूर्ण करू शकतात.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय नागरी सेवा नियम १९७२ अंतर्गत, कर्मचाऱ्याला दरवर्षी ३० दिवसांची अर्जित रजा दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्याला २० दिवसांची अर्धवेतन रजा, ८ दिवसांची प्रासंगिक रजा आणि २ दिवसांची मर्यादित रजा मिळते.
कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी या सर्व रजा घेतो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या सर्व रजा वृद्ध पालकांच्या काळजीसह वैयक्तिक कारणांसाठी घेता येतात. केंद्रीय सरकारी कर्मचारी, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही समाविष्ट आहेत, त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेऊ शकतात.