वीज समस्यांवर उपाययोजना राबवण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बोलावली उच्चस्तरीय आढावा बैठक
मालवण : आमदार निलेश राणे यांची विधिमंडळातील दमदार कामगिरी महाराष्ट्र अनुभवत असताना त्यांच्या मागण्यांची दखल विधिमंडळ व मंत्रालय स्तरावर तत्काळ घेतली जात आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी वीज समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याची गांभीर्याने तत्काळ दखल घेत चालू अधिवेशनातच ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बैठक बोलावली. त्यांनी या बैठकीत महत्त्वाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. हे सर्व पाहता मालवण-कुडाळला निश्चितच हक्काचे नेतृत्व मिळाले आहे. जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचत आहे. जनतेला न्याय मिळत आहे. अशा भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी संपूर्ण आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मांडणी करताना सभागृहात वीज प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची ऊर्जा विभागाने गांभीर्याने दखल घेतली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत वीज समस्यांबाबत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग
उपस्थित होते.