प्लॅस्टिक फुलांचा वापर बंद करण्याबाबत आमदार रोहित पाटील यांच्या निवेदनाला मुख्यमंत्रांकडून मान्यता
मुंबई : लवकरच श्रावण महिना सुरु होणार असून त्यांनतर गणेशोत्सव, दिवाळी, दसरा असे सण एकामागून एक साजरी केली जातील. या सणासुदीत तसेच, विविध उत्सवाच्या सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांना प्रचंड मागणी आहे. ज्यामुळे नैसर्गिक फुलांचा वापर कमी होऊ लागल्यामुळे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे, कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आमदार रोहित पाटील (Rohit patil) यांनी निवेदनाद्वारे केली.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर लवकरच बंदी आणेल, असे म्हटले आहे.
१०५ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र
रोहित पाटील यांनी प्लॅस्टिक फुलावर बंदी घालण्याच्या केलेल्या या मागणीला विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल 105 आमदारांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे. ही महत्त्वाची बाब आमदार रोहित पाटील यांनी लक्षामध्ये आणून दिली.
आ.रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात काय म्हंटले आहे?
राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
कृत्रिम फुलांवर बंदी आणणार
त्यामुळे शासन कृत्रिम फुलांवर लवकरच बंदी आणण्याची शक्यता असून, यंदाचा गणेशोत्सव तसेच त्यानंतर येणारे सर्व सण पर्यावरणयुक्त करण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरणार आहे. आमदार महेश शिंदे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत हा मुद्दा चर्चेला आणला होता. त्यावर, हा निर्णय घेण्यात आला आहे.