आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्तिक युतीची घोषणा
मुंबई: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे, आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. या साऱ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. ही निवडणूक भाजपा, शिवसेना आणि उबाठासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई जिंकण्यासाठी मोठी खेळी केली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती केली आहे.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तिक युतीची घोषणा केली.
भूतकाळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रिपब्लिकनसोबत झालेली युती फार काळ टिकली नव्हती, त्यामुळे शिवसेनेसोबत केलेल्या या नव्या युतीबद्दल बोलताना आनंदराज यांनी म्हंटले कि, "शिंदे हे वेगळे नेते असून ते सर्वांना सोबत घेऊन जातात. कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत." चळवळीतील नेत्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली. तर "ती महाविकास आघाडी होती. ही महायुती आहे. महाविकास आघाडी स्वार्थासाठी आली होती, आम्ही लोकांच्या कल्याणासाठी एकत्र आलो आहोत, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले.
...म्हणून एकनाथ शिंदेंसोबत आलो
खरेतर ही जी युती आहे ती बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली युती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एकनाथ शिंदे आणि आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री असतानाही शिंदे कार्यकर्त्याप्रमाणे वागत होते. कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातील माणसासोबत एकरूप होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा कार्यकर्त्यासोबत देशातला आणि महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज सोबत आहे. हा समाज अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला परंतु कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे या कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ व्हावा यासाठी आम्ही एकत्र येण्याचे ठरवले असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले.
शिवशक्ती-भीमशक्ती युतीची सुरुवात ठाण्यातूनच
आनंदराज आंबेडकर यांचा आणि माझा स्वभाव सर्वसामान्यांसारखा आहे. सर्वसामान्यांसाठी काहीतरी करावं हेच आमचं ध्येय असतं. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी वापरली पाहिजे, गोरगोरीब, दलित, शोषित, कष्टकरी यांना सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही तेच वाटायचे. आज बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा असलेले आंनदराज आहेत, दलित, पीडित, शोषितांसाठी ते काम करत आहेत. विचारांची, विश्वासाची आणि विकासाची ही युती असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच, यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवशक्ती-भीमशक्ती अशी युती केली होती. महाराष्ट्रात कुठेही नव्हती, पण आमच्या ठाण्यामधून शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीला सुरुवात केली होती, अशी आठवणही यावेळी शिंदेंनी सांगितली.
दरम्यान, आता रिपब्लिकन सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने एका प्रकारे शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत याचा चमत्कार दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.