मुंबई : मालेगावसह राज्यातील सर्वच अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मालेगाव येथील अनधिकृत कत्तलखान्यांच्या संदर्भात सदस्य विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मालेगावमधील कुरेशी मोहल्ला ते सरदार चौक या भागात कत्तलखान्यांची स्थिती चिंताजनक आहे. अनधिकृतपणे चालणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई करणे अपेक्षित असून काही ठिकाणी कारवाई झाली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाला आणखी कडक सूचना दिल्या जातील आणि जेथे अनधिकृत कत्तलखाने सुरू आहेत, तिथे तातडीने कारवाई करण्यात येईल, असे भोयर म्हणाले. दरम्यान, मालेगावमधील मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी सोडल्याचा पुरावा मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याबद्दल चौकशी करून कारवाई केली जाईल. मोसम नदीच्या संवर्धनासाठी सरकारने १० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातील ५ कोटी २६ लाख रुपये मालेगाव महापालिकेला देण्यात आले आहेत, असे माहिती सामंत यांनी दिली.