जळगाव: भुसावळ रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून जळगावकडे जाणारी श्री गणेश लक्झरी खासगी बस आमोदा गावाजवळ एका पुलावरून थेट मोर नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून जखमी प्रवाशांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आणि अपघातांच्या वाढत्या संख्येवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आक्रमक झालेले आमदार जावळे
आमदार अमोल जावळे आज चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. गेल्या महिन्यात याच रस्त्यावर २५ अपघातांच्या घटना घडल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला.
त्यांनी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावून, या ठिकाणी वारंवार अपघात का होत आहेत, याची सविस्तर माहिती घेतली. रस्त्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी, चुकीचे वळण, साईन बोर्ड आणि रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षात्मक कठड्यांची आवश्यकता या सर्व बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा
या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. "ज्या तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडत आहेत, त्यावर पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करून सुरक्षेची हमी द्यावी. अन्यथा यानंतर काही घटना घडल्यास माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. "तुम्ही काय करतात, काय देता याच्याशी मला घेणेदेणे नाही," असेही त्यांनी सुनावले.