मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा!" अशा बोचऱ्या शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला खुलं आव्हान दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यावरून सुरू असलेल्या राजकारणात आता शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.
"उद्धव ठाकरेंनीच निवडणुका थांबवल्या, आता घाबरत आहेत!"
आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासक नेमला. नवीन जनगणना नसतानाही त्यांनी २२७ ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करत २३६ वॉर्डांची रचना केली. यात घोळ घालून निवडणुका लांबवल्या. २३६ वॉर्ड रचनेचा हट्ट धरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि निवडणुका रोखून धरल्या."
शेलार पुढे म्हणाले, "आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. तरीही दोन निवडणुका लढल्यानंतर पुन्हा चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यातून पुन्हा निवडणुका लांबवण्याचाच डाव दिसतोय. निवडणुकीला घाबरणारा हा पक्ष आहे, तथाकथित मर्दांच्या पक्षांचा हा कारभार आहे," असं म्हणत शेलारांनी उबाठाला टोला लगावला.
सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीवर जोरदार ...
"मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष!"
मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष असल्याचंही शेलार यांनी अधोरेखित केलं. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान देत म्हटलं, "हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या!"
सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असली तरी, वॉर्ड रचनेपासून ते चिन्ह आणि पक्ष प्रकरण याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाने नोव्हेंबरमध्ये मतदानासाठी तयारी केली असली तरी, न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुन्हा अडथळे येण्याची शक्यता कायम आहे.