एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर तीनशे धावांचा टप्पा पार केला. मात्र त्यासोबतच भारताने आपले ५ गडी गमावलेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभमन गिल ११४ आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर खेळत होते.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. भारताची सुरूवात चांगली झाली नाही. केएल राहुल २ धावांवर खेळत असताना टीम इंडियाला पहिला झटका बसला. राहुल २ धावा करून बाद झाला. यशस्वी जायसवालने सलामीला साजेशी ८७ धावांची खेळी केली. तर त्याला साथ देणारा करूण नायर ३१ धावा करून बाद झाला.
करूण बाद झाल्यानंतर जायसवाल आणि गिलची जोडी जमली. मात्र जायसवालही ८७ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने त्यानंतर २५ धावा करत गिलची साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न अपुरे ठरले. पंतनंतर आलेला नितीश कुमार रेड्डी अवघी एक धाव करून बाद झाला. पहिल्या दिवसअखेर भारताने ५ बाद ३१० धावा केल्या आहेत.
भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले होते. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना संघात सामील केले गेले. बुमराह या सामन्यात खेळत नाही आहे.