वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता
दौंड : आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सव मानला जातो. लाखो भाविक ‘माऊली माऊली’चा गजर करत संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. या काळात संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि चैतन्याची लहर पाहायला मिळते. अनेकांना विठुरायाच्या भेटीचे वेध लागले आहेत. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. आता या वारीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंढरपूरला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी नराधमांनी या अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या गळ्यावर कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले.
फलटण: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना दि. २९ जूनला दुपारी ४ वाजण्याच्या ...
अज्ञातांचा शोध सुरु
पंढरपूरकडे (Pandharpur) जाणाऱ्या वारकऱ्यांना (Warkari) अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात वारकऱ्यांवर हल्ला करून लूट करण्यात आली. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोघेजण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दौंड तालुका हादरला
या घटनेत घडलेली आणखी गंभीर बाब म्हणजे, आरोपींपैकी एकाने गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या अमानुष कृत्यामुळे दौंड तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर वारीच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वारी म्हणजे श्रद्धेचा महापूर असताना अशा प्रकारची हिंसा आणि अत्याचार घडणं अत्यंत निंदनीय असल्याचं नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
विठुरायाच्या दर्शनाचे बोगस पास विकले
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास १०० रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेऊन चौकशी सुरू केली होती.