शुभाशीर्वाद अवकाशाचे...

  14

मनभावन : आसावरी जोशी


अवकाश म्हणजे एक निर्वात पोकळी... लहानपणापासून भूगोलाच्या तासाला घोकून पाठ केलेली माहिती. जसजसे आपण वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी होत जाऊन ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. ही झाली अगदी प्राथमिक भौगोलिक माहिती, पण या निर्वात पोकळीत अनेक काल्पनिक पण मजेच्या गोष्टी भरलेल्या होत्या. किंबहुना अजूनही त्या तशाच आहेत. प्रश्न फक्त आपल्या मानण्याचा आहे...


या मजेच्या गोष्टीतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवकाश हे देवबाप्पाचे घर. ते सगळ्यांनाच कसे दिसणार? बाप्पा ज्याच्यांवर प्रसन्न होतो. त्याला ते घर दिसते. या अवकाशात अनंत घडामोडी घडतात... पृथ्वीची प्रेमकथा या रुक्ष निर्वात पोकळीतच फुलली. सर्व देखण्या ग्रह- ताऱ्यांचे प्रेम नाकारून ती अजूनही भास्कराच्याच प्रतीक्षेत... त्यालाच समर्पित आहे... वर्षानुवर्षे सगळ्यांचा चांदोमामा आपल्या भाच्यांना तिथूनच मजेच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर आयुष्यभर पुरतील असे संस्कारधन देत आहे. कधी शुक्रतारा हिऱ्यागत चमचमत पाडगावकरांचे अजरामर प्रेमगीत आळवत राहतो, तर ध्रुव तारा ध्रुव बाळाच्या अढळ निश्चयाची महती सांगत राहतो. समस्त देव अवकाशातूनच आपल्यावर लक्ष ठेवतात आणि चांगल्या गोष्टींसाठी आशीर्वाद देतात, तर वाईट गोष्टींसाठी शिक्षा देतात.


आताही वास्तवात आपल्या या जादुई निर्वात पोकळीत ४१ वर्षांनंतर शुभंकर गोष्ट घडत आहे. घडली आहे. राकेश शर्मानंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शुभांशू शुक्लाचे पहिले भारतीय पाऊल पडले आहे. कप्तान शुभांशूने पाठवलेल्या पहिल्या संदेशाने आपल्या सगळ्या भारतीयांची मने जिंकली आहेत.


“नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो! काय एक सवारी! ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा एकदा अंतराळात परतलो आहोत. ही एक अद्भुत सवारी आहे. आपण पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रदक्षिणा घालत आहोत. माझ्या खांद्यावर कोरलेला तिरंगा मला सांगतो की, मी तुमच्या सर्वांसोबत आहे. माझा हा प्रवास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची सुरुवात नाही, तर भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनी या प्रवासाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमची छातीही अभिमानाने फुलली पाहिजे... एकत्रितपणे, भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात करूया. जय हिंद! जय भारत!”


शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक, अभियंता आणि इस्रो अंतराळवीर आहेत. भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा भाग म्हणून अंतराळात गेलेल्या चार अंतराळवीरांपैकी ते पहिले आहेत. ते सध्या अ‍ॅक्सिओम मिशन ४ मध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर आणि १९८४ मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर कक्षेत प्रवास करणारे दुसरे भारतीय आहेत. २०१९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या अंतर्गत भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM) या संस्थेने शुक्ला यांना अंतराळवीर निवड प्रक्रियेत समाविष्ट केले होते. नंतर IAM आणि ISRO ने त्यांना अंतिम चारमध्ये निवडले. २०२० मध्ये ते युरी गागारिन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात निवडलेल्या इतर तीन अंतराळवीरांसह मूलभूत प्रशिक्षणासाठी रशियाला गेले. २०२१ मध्ये मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर ते भारतात परतले आणि बंगळूरुमधील अंतराळवीर प्रशिक्षण सुविधेत प्रशिक्षण घेतले. या काळात त्यांनी भारतीय विज्ञान संस्थेतून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी अंतराळवीर संघातील सदस्य म्हणून त्यांचे नाव पहिल्यांदा २७ फेब्रुवारी २०२४ रोजी तिरुअनंतपुरम येथील इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.


शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुरू असलेल्या अ‍ॅक्सिओम मिशन ४ मोहिमेसाठी मिशन पायलट म्हणून काम करत आहेत. ते कमांडर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील क्रूचा भाग आहेत, त्यांच्यासोबत मिशन तज्ज्ञ स्लावोस उझ्नान्स्की-विस्निव्स्की आणि टिबोर कापू आहेत. इस्रोचे सहकारी अंतराळवीर प्रशांत नायर यांना बॅकअप क्रू सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. नासा, स्पेसएक्स आणि इस्रो यांच्यातील सहकार्याने सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश आंतरराष्ट्रीय अंतराळ उड्डाण सहकार्य मजबूत करणे आहे.



अवकाश स्थानकम्हणजे काय?


अवकाश स्थानक हे खरे तर अवकाशयानच असते; परंतु त्यामध्ये अंतराळवीरांना प्रयोग करण्याची, तसेच त्यांच्या राहण्याचीही सोय असते. त्या प्रकारे त्याची बांधणी केलेली असते. अवकाशाशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, सूर्याची निरीक्षणे करण्यासाठी, तसेच पूरक असे प्रयोग करण्यासाठी अवकाश स्थानक विकसित केले जाते. विविध पदार्थांवर अवकाशात नेमका काय परिणाम होतो, मानवी शरीरावर कसा परिणाम होतो; विशेषत: गुरुत्वीय शक्ती नसताना किंवा ती अतिशय सूक्ष्म स्वरूपात असताना काय परिणाम होतो, याचाही अभ्यास याद्वारे केला जातो. छोटी अवकाश स्थानके पूर्णत: विकसित करूनच अंतराळात सोडली जातात; परंतु मोठी अवकाश स्थानके मोड्यूलच्या स्वरूपात पाठविली जातात आणि तिथे भ्रमणकक्षेत जुळणी केली जाते.



अवकाश स्थानकेकधीपासून सोडली गेली?


१९७१ पासून आतापर्यंत ११ अवकाश स्थानके सोडण्यात आली आहेत. ती प्रामुख्याने तत्कालीन सोव्हिएत संघ, अमेरिका, आताचा रशिया आणि चीन यांची आहेत. रशियातर्फे सॅल्यूट, मीर, अमेरिकेतर्फे स्कायलॅब, चीनतर्फे तियोनगाँग ही स्थानके प्रक्षेपित करण्यात आली आहेत.



आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक म्हणजे काय?


विविध देश एकत्र येऊन जे अवकाश स्थानक बनवितात, त्याला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (आयएएस) म्हणतात. अमेरिका, रशिया, युरोपीय देश, कॅनडा, जपान यांच्या पुढाकारातून नोव्हेंबर २०००पासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक कार्यरत आहे. त्यात विविध देशांतील अंतराळवीर एकत्रितपणे प्रयोग करतात.



अवकाश स्थानकांचा उपयोग काय?


अवकाशातील संशोधनासाठी, सूक्ष्म गुरुत्वीय शक्तीतील प्रयोगांसाठी अवकाश स्थानकांचीच
गरज असते. या संशोधनाचा पृथ्वीवर अर्थातच उपयोग आहे.



व्यायाम


स्टेशनवर व्यायामाच्या उपकरणांचा संच आणि एक स्थिर सायकल आहे. प्रत्येक अंतराळवीर रोज कमीत कमी दोन तास या उपकरणांवर व्यायाम करतो. ते स्वतःला उपकरणांशी बांधून ठेवण्यासाठी बंजी केबलचा वापर करतात.
झ्वेज्दा मोड्यूलमधील अंतराळ शौचालय
आयएसएसवर शॉवर नाही. चमू अंघोळीसाठी ओले कपडे आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करतात. पाणी वाचवण्यासाठी फेस न होणारा शाम्पू आणि खाता येऊ शकणारी टूथपेस्ट वापरली जाते. स्थानकावर रशियन रचनेची दोन शौचालये आहेत; एक झ्वेज्दा आणि एक ट्रँक्विलीटीमध्ये आहे. अंतराळवीर प्रथम स्वतःला शौचालयाच्या सीटशी घट्ट बांधतात. एक तरफ शक्तिशाली पंखा चालू करते आणि हवा शोषून घेणारे भोक उघडते. हवेचा प्रवाह मलमूत्र दूर घेऊन जातो. मल पिशव्यांमध्ये जमा केला जातो आणि मूत्र जमा करून पाणी पुनर्प्राप्ती प्रणालीकडे पाठवले जाते जिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पाणी बनवले जाते.



झोप


चमूला झोपण्यासाठी प्रत्येकासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. झ्वेज्दामध्ये दोन आणि हार्मनीमध्ये चार कक्ष आहेत. चमूतील सदस्य त्यांच्या कक्षामध्ये बांधून ठेवलेल्या स्लीपिंग बॅगमध्ये झोपू शकतात.



अन्न व पाणी


स्थानकावरील सर्वाधिक अन्न निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) सीलबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये आहे. धातूचे डबे खूप जड आणि वाहतूक करण्यासाठी महाग असतात, म्हणून जास्त नाहीत. जतन अन्नाकडे सामान्यतः जास्त लक्ष दिले जात नाही. सूक्ष्म गुरुत्वामुळे चव कमी लागत असल्याने अन्न अधिक रुचकर करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. स्वयंपाकात नेहमीपेक्षा जास्त मसाले वापरले जातात आणि चमू ताजी फळे आणि भाज्या पृथ्वीवरून घेऊन येणाऱ्या अंतराळयानाची आतुरतेने वाट पाहतात.
अवकाशाची ही निर्वात पोकळी नेहमीच आपल्यावर शुभंकाराचाच वर्षाव करत आली आहे.. आताही या वर्षावाने आपण सुखावले आहोत..

Comments
Add Comment

लुप्त झालेला नाट्य खजिना : भांगवाडी थिएटर

भालचंद्र कुबल : पाचवा वेद सध्या राजकीय वारे शिक्षणाच्या दिशेने वाहणाऱ्या हिंदी भाषेच्या झग्यात शिरलेत.

कलावंताला जेव्हा ‘डॉक्टराश्रय’ मिळतो...

राजरंग : राज चिंचणकर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे हे रंगभूमीवर ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे नाट्य सादर करत असतात.

अभिनयासोबत निर्मिती देखील

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  नूतन जयंत या अभिनेत्रीने अभिनयासोबत निर्मितीच्या क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे.

प्रत्येक प्रेक्षकाने पडताळून पाहावी अशी “भूमिका”

पाचवा वेद : भालचंद्र कुबल  आज ज्या दिवशी मी ‘भूमिका’ या नाटकाचं निरीक्षण लिहितोय त्याचवेळी सध्या आणखी चार मराठी

काळी जादू...

मनभावन : आसावरी जोशी जादू... या दोन अक्षरांचे आपल्यासारख्या सामान्यांना प्रचंड आकर्षण.. अशक्यप्राय गोष्ट घडणे

रंगभूमीवरचा ‘पठाण’... वय वर्षे ८५...

राजरंग : राज चिंचणकर रंगभूमीवर ऐन उमेदीच्या काळात साकारलेल्या भूमिका, त्या कलावंतांनी वयोपरत्वे रंगभूमीवरून