पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या आणीबाणीच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील जनतेनेही लोकशाही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केले.
आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधान हत्या दिनाचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे बुधवारी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर पालघर तहसीलदार रमेश शेंडगे, तहसीलदार सचिन भालेराव, आणीबाणी विरोधी लढा देणारे पालघर जिल्ह्यातील वीर योद्धे, तसेच नागरिक उपस्थित होते.
आणीबाणी काळात देशातील महत्त्वाच्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या संघटनावर बंदी घालण्यात आली विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, तसेच उद्योगपतीनाही तुरुंगवास भोगावा लागला. लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सन्मान धारकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना मानधन सुरू केले आज आपण सर्वांना सन्मानपत्र सुद्धा दिले. आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या सन्मान धारकाच्या काय समस्या असेल तरी ती लवकरात लवकर सोडविली जाईल असा विश्वासही खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्ह्यातील १२६ योद्धे व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ८ योद्ध्यांनी आणिबाणी काळातील आपले अनुभव सांगितले. काही आंदोलनकर्त्यांच्या वारसांना अद्याप ही मदत मिळाली नसल्याने प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी मानधनापासुन वंचित असलेल्यांना न्याय देण्याचे अश्वासन दिले. लोकशाही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक लोकशाही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून नागरिकांचे मूलभूत अधिकार २५ जून १९७५ रोजी कमी करण्यात आले.
या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार लोकशाही वाचवण्यासाठी सहभाग नोंदवलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सन्माननिधी बाबत काही समस्या असल्यास त्या लवकरात लवकर जिल्हा प्रशासनामार्फत सोडविण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी व्यक्त केला.