भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर
आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि स्वप्नवत आहे. भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी इतिहास रचलाय. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे शुभांशु शुक्ला पहिले भारतीय ठरले आहेत. ॲक्सिऑम-४ मिशनच्या या थरारक प्रवासानं भारताला अंतराळ संशोधनात नवी उंची गाठून दिलीय. चला जाणून घेऊया हा ऐतिहासिक क्षण आणि त्यामागील प्रेरणादायी कहाणी.
२७ जून २०२५. दुपारचे बारा वाजून एक मिनिट. सर्वांच्या नजरा स्थिरावल्या. आणि काही क्षणात अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च कॉम्प्लेक्स ३९A वरून स्पेसएक्सचं फाल्कन ९ रॉकेट अवकाशात झेपावलं. हेच ते ऐतिहासिक प्रक्षेपण स्थळ आहे जिथून नील आर्मस्ट्राँग यांनी अपोलो ११ मिशनसाठी उड्डाण केलं होतं. आणि आता या ठिकाणाहून भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी गगनभरारी घेतली आणि भारताच्या अंतराळ संशोधनाच्या स्वप्नांना नवे पंख दिले. २८ तासांच्या थरारक प्रवासानंतर ॲक्सिऑम-४ मिशनचं क्रू ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी यशस्वीपणे जोडलं गेलं. दुपारी ४ वाजून १ मिनिटांनी शुभांशु यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाय ठेवला आणि भारताचा तिरंगा आकाशात फडकावला. तमाम भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे.
१४ दिवसात ६० प्रयोग
शुभांशु शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेच्या पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोझ विस्निव्हस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे अंतराळवीरही आहेत, मात्र या मिशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे भारत करणार असलेले सात प्रयोग. पुढील १४ दिवसात शुभांशु आणि त्यांचे सहकारी ६० प्रयोग करतील. पीक, बियाण्यांशी संबंधित प्रयोग, बियाण्यांच्या अनुवंशिक गुणधर्मांवर होणारा परिणाम, अर्ध्या मिमीपेक्षा लहान टार्डिग्रेड्सवर अभ्यास, लहान जीवाच्या शरीरावर अवकाशाचा होणारा परिणाम, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा स्नायूंवर होणारा परिणाम, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर सूक्ष्म शेवाळांचा होणारा परिणाम आणि भविष्यात अंतराळवीरांच्या पोषणात याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते का? या विषयांवर अभ्यास केला जाणार आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. याच लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये ...
"हा प्रवास अविस्मरणीय होता. जेव्हा रॉकेटने उड्डाण केलं त्यावेळी फक्त विचार करत होतो. 'चला, आता जाऊया!' आणि जेव्हा आम्ही अवकाशात पोहोचलो तेव्हा सगळं शांत झालं. मी फक्त तरंगत होतो आणि ते खरंच जादुई होतं", अशा भावना शुभांशु यांनी व्यक्त केल्या आहेत. शुभांशु शुक्ला यांनी केवळ स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं नाही, तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हेवा वाटावा अशी कामगिरी केलीय. या मिशनला यशस्वी करण्यासाठी तब्बल सहा वेळा प्रक्षेपण पुढे ढकललं गेलं. मात्र शेवटच्या क्षणी सर्व काही जुळून आलं आणि मग फाल्कन ९च्या मर्लिन इंजिन्सनी गर्जना करत आकाशात झेप घेतली. शुभांशु शुक्ला यांनी भारताचं नाव अंतराळात चमकवलंय. त्यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीय तरुणाला प्रेरणादायी आहे आणि भारताच्या अंतराळ संशोधनाचा हा एक नवा अध्याय आहे. जर स्वप्न मोठी असतील आणि प्रामाणिक मेहनत करत असाल तर आकाशालाही मर्यादा नाहीत, हे शुभांशु शुक्ला यांनी दाखवून दिलंय. त्यामुळे भारताचा हा अंतराळवीर अर्थात शुभांशु शुक्ला यांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवलंय.