पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन विठ्ठल माउलींच्या नामाचा गजर करत त्यांच्या भक्तीत लीन होताना दिसतात. वर्षातून एकदा येणारी ही आषाढी वारी यावर्षी ६ जुलै रोजी आली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागू लागल्या आहे. त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले आहे. विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना चांगले दर्शन घेता यावे यासाठी मंदिर आता २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे.
अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशी निमित्त, वारकऱ्यांची आणि भाविकांची पंढरपूर मंदिरात होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७) सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
श्रींचा पलंग काढला
आषाढी एकादशीला भाविकांची मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार आज (दि.२७) चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक १६ जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ॲड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.