
बीसीसीआयने रोहित शर्मानंतर भारताच्या टी २० क्रिकेट संघाचे नेतृत्व ३४ वर्षांच्या सूर्यकुमार यादवकडे सोपवले. पण शस्त्रक्रियेमुळे सूर्यकुमार यादव बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. पूर्ण बरा होण्यासाठी सूर्यकुमारला किमान सहा ते बारा आठवडे लागतील.
पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताच्या टी २० क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यानंतर भारत बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि टी २० मालिका खेळवली जाणार आहे. पहिला टी २० सामना २६ ऑगस्ट २०२५ रोजी तर शेवटचा टी २० सामना ३१ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.
सूर्यकुमार यादवची सोशल मीडिया पोस्ट
'लाइफ अपडेट, पोटाच्या खालच्या उजव्या भागात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, मी बरा होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.'
View this post on Instagram
सूर्यकुमार यादवची कारकिर्द
सूर्यकुमार यादवने तिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एक कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ८३ टी २० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ७७३ धावा आणि टी २० मध्ये २५९८ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने टी २० मध्ये चार शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत. तो रुग्णालयात दाखल होण्याआधी मुंबई लीग २० या काही दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेत खेळला होता.