लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय संघासमोर कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ तीन सामनेच खेळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता बुमराहला एजबॅस्टन कसोटी सामन्यात सक्तीची विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बुमराह दुसरा कसोटी सामना खेळणार नसल्याने टीम इंडियाला याचा फटका बसणार आहे.
जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या ५ फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या डावात त्याला फारसे यश मिळाले नव्हते. ही कसोटी भारताला ५ विकेट्सने गमवावी लागली होती. आता दुसऱ्या कसोटीत बुमराहऐवजी अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे. आता बुमराहच्या अनुपस्थित टीम इंडियाला इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.