तोडलेल्या शौचालयांचे काम कुर्म गतीने
मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगरातील तसेच बाजूच्या नालंदा नगरातील रहिवाशांची सोमवारपासून गेले दोन दिवस पाणी आणि शौचालये यासाठी वणवण सुरू आहे. या भागाचा पाणीपुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे पाण्याअभावी लोकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, याबाबत पालिकेचे एन विभागातील संबंधित अधिकारीही प्रतिसाद देत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या भागातील पाणीपुरवठा सोमवारी सकाळपासून बंद करण्यात आला होता .
त्यामुळे येथील शौचालये ओस पडली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा आणि गैरसोय झाली. तर दुसरीकडे या भागात काही शौचालये वर्षभरापासून तोडण्यात आल्याने त्यांचीही या हालात भर पडली. मंडळवारी दुपारी काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र गढूळ पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. अनेकांनी दुकानातून मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घेऊन आपली तहान भागवली.
मात्र सर्वांनाच हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याच्या भावना काहीनी याबाबत बोलताना व्यक्त केल्या. याबाबत पालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्याशी संपर्क साधला. मात्र तो न होऊ शकल्याने याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया समजू शकल्या नाहीत.
माता रमाबाई आंबेडकर नगरातील प्रियदर्शनी मित्र मंडळ आणि अर्चना स्टोअर्स समोरील सुलभ शौचालय हे मोडकळीस आल्याने गेल्यावर्षी १० ऑगस्टपासून बंद करून नंतर ते तोडण्यात आले. मात्र त्या ठिकाणी आता पायाभरणीही झाली आहे. बांधकाम कुर्म गतीने सुरू असून, आता त्यातील खड्ड्यात लोखंडी सळई टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हे कधी पूर्ण होणार असा सवाल रहिवासी करत आहेत. तर दुसरीकडे येथील हजारो रहिवाशांची वणवण या भागातील इतर शौचालयांकडे सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली.