मुंबई : राज्यात दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुढील काही दिवसांनी म्हणजेच दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडल्यामुळे काही भागात लोकांचं प्रचंड नुकसान झालंय. तरी ही विदर्भात अजूनही पाऊस पडला नसल्याने तेथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पुण्यात ऑरेंज अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
पुण्यातील इतर भागात ही शनिवारी ढगाळ वातावरण होते, परंतू संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघर, ठाणे,मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर इथं तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अनेक जिल्हे कोरडे असल्याने विदर्भातील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पाऊस न पडल्यामुळे अकोल्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. विदर्भातील अद्यापही तापमान कमी झालेलं नाही. पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे. नागपूरमध्ये तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर आहे. ज्या भागात पाऊस झाला तिकडे जवळपास 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाचे म्हणजे आता ज्यांनी पेरणी केली ते शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत.