Wednesday, June 18, 2025

जिल्ह्यातील दहा धोकादायक पर्यटन ठिकाणांवर बंदी

जिल्ह्यातील दहा धोकादायक पर्यटन ठिकाणांवर बंदी

दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क


अलिबाग : रायगडात आता मृगाच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पहिल्या चरणात वरुणराजाने बऱ्यापैकी बरसात केलेली असून, त्यामुळे आता जिल्ह्याला पावसाळी पर्यटनाचे वेध लागलेले आहे. यापूर्वी घडलेल्या अनेक दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्या चार वर्षांपासून पावसाळी पर्यटनस्थळे असलेल्या ठिकाणी बंदी घातली होती. यावेळीही ठिकठिकाणच्या धबधब्यांच्या धोकादायक पर्यटन ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे.


अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने गेल्या १५ वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यातही पर्यटनाला येणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात असते. उत्साहाच्या भरात काही पर्यटक नियम व कायदे धाब्यावर बसवतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात पर्यटक धबधब्यावर जाणे पसंत करतात. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील सिद्धेश्वर, तिनवीरा धरण, पनवेल तालुक्यातील देहरंग, गाढेश्वर धरण, कर्जतमधील आषाणे, सोलनपाडा खालापूर तालुक्यातील झेनिथ, माणगाव तालुक्यातील देवकुंड, ताम्हाणी घाटातील धबधबे आदींचा समावेश आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. याठिकाणी पर्यटक मद्यपान करून धिंगाणा करतात. मुलींची छेडछाड, समुद्राच्या पाण्यात खोलवर जाणे असे प्रकार घडत असतात. यामुळे अनेक दुर्घटना घडतात. काहींना आपले प्राण गमवावे लागले आहे.


पर्यटकांना सुरक्षा मिळावी कोणताही अपघात होऊ नये, दुर्घटना घडू नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासन लक्ष ठेवण्याच्या सुचना विभागांना देते. दरवर्षी प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करते. जिल्ह्यात सर्वत्र आपत्तीच्या दृष्टीने धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई करण्यात येते. असे असले तरी पर्यटकांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे.


दरम्यान, नव्याने येणाऱ्या पर्यटकांना पुरेशी माहिती नसताना पाण्यात उतरण्याचे धाडस करतात. अपघात घडतात, यामध्ये काहींना प्राणाला मुकावे लागले आहे. खरेतर अशा ठिकाणी योग्यते मार्गदर्शन करून पर्यटकांना आनंद घेऊ द्या, ही मागणी अनेकदा झाली आहे. मात्र स्थानिक प्रशासन लगेच बंदीची कारवाई करून मोकळे होते; परंतु पर्यटक येण्याचे काही थांबत नाहीत. पावसाळी पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतो. जी ठिकाणे खरोखरच धोकादायक आहेत, तिथे बंदी असलीच पाहिजे; परंतु जिथे धोका नाही, तिथे सरसकट बंदी कशासाठी? अशी विचारणा स्थानिक व्यावसायिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment