पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील कासा गावात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका रिक्षा चालकांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपावर वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षा चालकांना आठ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा चालकांचा धंदा होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या काही दिवसांपासून रिक्षाचालक सकाळी सीएनजी भरण्यासाठी पंपावर जातात. पण तेथे वीज पुरवठा खंडित असल्याने सीएनजी मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रिक्षाचालक दिवसभर रिक्षा चालू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना उपासमारीचे संकट पडले आहे. रिक्षा चालकांनी रिक्षा कर्ज काढून घेतल्या असल्यामुळे हप्ता कसा भरायचा या विवंचनेत आहेत. सध्या शाळा व कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे पोहोचवणे व घरी पोहोचवणे यासाठी रिक्षा लावल्या आहेत.
विजेचा खोळंबा होत असल्याने सीएनजी वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचना सुरू झाली आहे. कासा चारोटी परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने रोज प्रवासी रिक्षा धंद्यावर उदरनिर्वाह करणारे ४०० ते ५०० रिक्षा चालकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.