तुकोबा पालखी सोहळ्याला प्रारंभ
लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज दुपारी अडीजच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थानं ठेवतील. जगदगुरू संत तुकाराम यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहूनगरीतून पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणा करून मार्गस्थ होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव व दिंड्या इथं दाखल झालेल्या आहेत. काय आहे माहिती जाणून घेऊया या लेखातून...
महाराष्ट्राला आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात लीन होत आहेत. यंदा संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या आषाढी सोहळ्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी व भाविकांमुळं देहुनगरी गर्दीने फुलून गेली आहे. 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम 'चा जयघोष असं वातावरण इथं पाहायला मिळतयं.
माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज अवंदा गर्दी हाय म्हणत्यात... पाऊस बक्कळ हाय बघा, पण पेरण्या रखडल्यात. असो, माउली बघून घेतील ओ..! चला ...
ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता काना - कोपर्यातून वृद्ध महिला-पुरुष वारकरी, माऊली व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले दिसत होते. देहुनगरीमध्ये काही ठिकाणी रस्ते व चौक बंद असले तरी मार्ग काढत वारकरी मंदिर परिसरात गर्दी करत होते. अभंग व टाळ- मृदंगाच्या नादातील भजनाने देहुनगरी न्हाऊन निघालीय. इंद्रायणीचा घाट भाविकांनी सजला आहे. सर्व रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलल्याचे दिसत आहे. देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुढे पंढरपूरपर्यंत महिनाभर पायी वाट तुडवत आणि विसावा घेत जाण्यासाठी लागणारा तुटपुंजा संसार पाठीवर आणि काखेत अडकून वारकरी निघाले आहेत.
प्रवासासाठी छत्री, नाहीतर रेनकोट, कपडे, अंथरूण आणि खाण्याच्या सामानाची पिशवी बास एवढेच काय ते सामान. प्रमुख दिंड्याच्या उपस्थित वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात आज सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी साडे सहा वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.