शहापुरातील शेतकऱ्यांना तीन महिने पैसे नाहीत

शेतकरी आर्थिक संकटात


शहापूर : तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कारण, त्यांनी शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर धान्यविक्री करून दोन ते तीन महिने उलटले असतानाही त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.


यावर्षी शासनाने धान्याला हमीभाव देत बोनसचीही घोषणा केली होती, त्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर आपले भात पोहोचवले. परंतु या खरेदी प्रक्रियेनंतरही तब्बल १ हजार ५०० शेतकऱ्यांना ना मूळ विक्री रक्कम मिळाली आहे, ना बोनस.


परिणामी बियाणे, खते, मशागत यांसाठी लागणारा खर्च करणे शेतकऱ्यांना अशक्य होत चालले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे आगमन झाल्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, खात्रीशीर उत्पन्नाच्या अभावी आणि थकीत रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अडचणीत आणणारी झाली आहे. ट्रॅक्टर भाड्याने घेणे, बियाणे खरेदी करणे, खते मिळवणे यासाठी पैशांची नितांत गरज आहे. पण बँकांच्या दारात फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शासनाने दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.


हमीभाव २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून बाजार भावाच्या तुलनेत हा पर्याय नक्कीच चांगला वाटतो. पण जेव्हा मूळ विक्री रक्कमच शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही, तेव्हा बोनस फक्त कागदावरच उरतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाकडून बोनस जाहीर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या हाती केव्हा पडणार, याचा काही अंदाज नसल्याचे ॲड. प्रशांत घोडविंदे यांनी सांगितले.


लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा करावी आणि बोनसही वितरित करावा. अन्यथा खरिपाची तयारी करणे कठीण होईल आणि शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर जाईल. यावर्षी हवामान बदलामुळे आधीच पीक नुकसान झाले आहे, त्यात शासन वेळेवर पैसे देत नसेल, तर शेतकऱ्यांचा शासनावरचा विश्वास पूर्णपणे ढासळेल. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे, असे भात उत्पादक शेतकरी भगवान सांबरे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे