मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी, २४ तासांत या महामार्गावरून तब्बल ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला. यापैकी ५ हजार वाहने नव्याने वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी – आमणे टप्प्यावरून धावली.
'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील ६२५ किमी लांबीचा नागपूर – इगतपुरी टप्पा वाहतूक सेवेत होता.
इगतपुरी – आमणे हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाला असून नागपूर – आमणे, ठाणे प्रवास १६ तासांऐवजी ८ तासात करणे शक्य झाले आहे. एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नागपूर – इगतपुरीदरम्यान अडीच वर्षात (१ जून २०२५पर्यंत) दोन कोटी ११ लाख ३४ हजार ३२२ वाहनांनी प्रवास केला आहे. तर या वाहनांकडून पथकराच्या रुपाने एमएसआरडीसीला १५३० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आता नागपूरवरून थेट ठाणे, मुंबईला अतिजलद येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि नागपुरला जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. पहिल्या दिवशी समृद्धी महामार्गावरील प्रवासी संख्येत चांगली वाढ झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.