विदर्भातली वर्धा जिल्ह्यापासून कोकणापर्यंत ८०५ किमी. लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाद्वारे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर,धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडले जाईल. या सहा पदरी महामार्गावर २६ ठिकाणी इंटरचेंज असतील. या रस्त्यावर ४८ मोठे पूल, ३० बोगदे असतील. या मार्गाद्वारे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवनी, नांदेडची माहूरची रेणुका देवी या शक्तिपीठांना जोडले जाईल. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.
आता महाराष्ट्रातील २४ जिल्हे जेएनपीटीसोबत जोडले गेले आहेत. आता राज्यातील जिल्हे वाढवण बंदराशी जोडण्याचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्गाने हे काम सुरू केले आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्याचे टप्प्याचे पंतप्रधान मोदींनी, दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी, तिसऱ्या टप्प्याचे दादा भुसे यांनी आणि अंतिम टप्प्याचे मी उद्घाटन करत आहे. एकूण चार टप्प्यांत तयार झालेल्या समृद्धी महामार्गाचे प्रकल्प पूर्ण करुन लोकार्पण करण्यात आले आहे. या मार्गावर ७३ पूल आहेत. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी अंडरपास आणि ओव्हरपास करण्यात आले आहेत.
शेवटचा टप्पा ७६ किमी आहे. यामध्ये पाच जुळे बोगदे आहेत. बोगद्यात साठ डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. यात दोनशे मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. एकूण २२ ठिकाणी सुविधा केंद्र असतील. हा स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण एक गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल. शिर्डी, अजिंठा अशी ट्रॅफिक दहा लाख प्रति महिना सुरू आहे. ती आधी दोन लाख होती. आता शेवटच्या टप्प्यामुळे यात अजून वाढ होईल. वाशीच्या पुलावर ट्रॅफिक जॅम होते. ते कमी करण्यासाठी वाशीच्या पुलाचे लोकार्पण करत आहोत. जेव्हा काम सुरू केले तेव्हा अनेकांना वाटत होते की हे काम होणार नाही. पण आम्ही ते करून दाखवले. महायुतीच्या काळात याचे काम सुरू केले आणि आनंद आहे की महायुतीच्या काळात याचे लोकार्पण केले आहे. यापुढे आपल्याला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. मराठवाड्याचं आर्थिक आणि औद्योगिक चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.