मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयार आहे. काही खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये पोहोचलेत. तर काही खेळाडू लवकरच पोहोचतील. या दौऱ्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलने गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने बंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
बंगळुरू प्रकरणावर काय म्हणाले कोच
बंगळुरू प्रकरणावर जेव्हा कोच गंभीरला विचारले की तुम्ही या दुर्घटनेला कोणाला जबाबदार मानता, यावर गंभीर म्हणाला, कोण जबाबदार आहे हे ठरवणारा मी कोणी नाही. मात्र जेव्हा मी खेळाडू होतो तेव्हा अशा प्रकारच्या रोड शोवर विश्वास ठेवत नव्हतो. आता कोच म्हणूनही माझा याला पाठिंबा नाही. लोकांचे जीवन सगळ्यात महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला गर्दी नियंत्रणात ठेवता येत नसेल तर अशा रोड शोची कोणतीही गरज नाही.
गौतम गंभीर पुढे म्हणाले, मी नेहमीच मानतो की रोड शो नसले पाहिजे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले त्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. २००७मध्येही जेव्हा आम्ही जिंकलो होतो तेव्हाही माझे म्हणणे हेच होते. अशा प्रकारचे आयोजन बंद दरवाजाच्या आत असले पाहिजे. तेथे जे काही घडले ते अतिशय दु:खद होते. आम्ही एक खेळाडू, फ्रेंचायझी आणि चाहते म्हणून अधिक जबाबदार असले पाहिजे.