महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धरले धारे
पालघर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या व्हाईट टॅपिंगचे काम १० दिवसांत पूर्ण करून १२ जूनला याच कामासाठी घेण्यात येणाऱ्या आढावा सभेला कामाची पूर्ण माहिती सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि कामाबाबत असलेली उदासीनता पाहून जिल्हाधिकारी जाखड यांनी सोमवारी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूकदारांना सोयीचा आणि लवकर प्रवास व्हावा म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये प्रारंभ करण्यात आले. दहिसर चेकनाका तर तलासरी या १२० किलोमीटरमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र व्हाईट टॅपिंगचे काम अद्याप झालेले नाही. एप्रिल अखेरपर्यंत ९७ टक्के काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी केला आहे. दरम्यान, काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी आहेत. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे सतत या महामार्गावरून प्रवास करीत असून, निकृष्ट कामासह महामार्गाच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वीच आमदार राजेंद्र गावित यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्हाईट टॅपिंगचे काम चांगल्या दर्जाचे व तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, २ जून रोजी पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी यांचा महामार्गाच्या पाहणीचा दौरा होता.
वसई फाटा परिसरात रखडलेल्या व्हाईट टॅपिंगच्या कामाच्या जवळ पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक व जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी कामाची पाहणी केली.
पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे देण्यात येत नव्हती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, वसई-विरार महापालिका, एमएमआरडीए आणि महावितरण यांनी समन्वय ठेवून महामार्गाचे सर्व रखडलेले काम पूर्ण करण्याबाबत आजच "प्लॅन" तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल अशी विचारणा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी ८ ते १० दिवसांत काम पूर्ण करणार असे सांगितले. त्यामुळे १० दिवसात काम पूर्ण करून सविस्तर माहिती घेऊन या, १२ जून रोजी याच विषयावर आढावा सभा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना या कामावर वारंवार यावे लागते, हे योग्य होत नसल्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.