क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

राजीव शुक्ला होणार BCCI चे अध्यक्ष ?

  38

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI / Board of Control for Cricket in India) अध्यक्ष रॉजर बिन्नी १९ जुलै रोजी ७० वर्षांचे होतील. बीसीसीआयच्या नियमानुसार अध्यक्षांचे वय ७० पेक्षा जास्त असून चालत नाही. या कारणामुळे रॉर बिन्नी लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नव्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. पुढील निर्णय होईपर्यंत राजीव शुक्ला यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव शुक्ला यांना तीन महिन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष केले जाईल.

राजीव शुक्ला ६५ वर्षांचे आहेत आणि अनेक वर्षांपासून बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत. त्यांचा आतापर्यंतचा कामाचा अनुभव बघता त्यांचाच भविष्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी विचार होण्याचीही शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत उतरुन राजीव शुक्ला अध्यक्षपदासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

रॉजर बिन्नी २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ३६ वे अध्यक्ष आहेत. याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष होता. गांगुलीने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. यानंतर झालेल्या निवडणुकीसाठी फक्त रॉजर बिन्नी यांचाच उमेदवारी अर्ज आला. यामुळे रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. बिन्नी अध्यक्ष असतानाच्या काळात भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या दोन मर्यादीत षटकांच्या स्पर्धा जिंकल्या. भारताने आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. रॉजर बिन्नी यांच्या काळात ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग सुरू झाली. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन मिळाले. खेळाडूंचे वेतन वाढवण्यात आले आणि टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळता यावे यासाठी योग्य आणि कठोर पावले उचलण्यात आली.



रॉजर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे प्रमुख खेळाडू होते. अष्टपैलू असलेल्या बिन्नी यांनी २७ कसोटी सामने आणि ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४७ बळी घेतले आणि पाच अर्धशतकांसह ८३० धावा केल्या. तसेच ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७७ बळी घेतले. एका अर्धशतकासह ६२९ धावा केल्या. बिन्नी यांनी १९८३ च्या विश्वचषकात १८ बळी घेतले होते. बिन्नी यांनी यापूर्वी बीसीसीआय निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
Comments
Add Comment

RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने

IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी

RCB vs PBKS, IPL 2025: तब्बल १७ वर्षांनी आरसीबीचे पहिल्यावहिल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब, पंजाबवर ६ धावांनी जबरदस्त विजय, कोहलीच्या डोळ्यात आनंदाश्रू

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने पंजाब किंग्सवर जबरदस्त