मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांचा विजेचा पुरवठा अनेक तासांसाठी खंडीत झाला होता. या घटनेची जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली. यानंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कुडाळमध्ये तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. कंपनीने नियंत्रण कक्ष स्थापन केल्यानंतर या कक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी कुडाळमध्ये कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कक्षाकडे किती तक्रारी आल्या आणि त्यातील किती सोडवल्या गेल्या तसेच कशा प्रकारे सोडवल्या गेल्या याची माहिती घेतली. यनंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे, आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच अनेक तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या असे मंत्री नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.