पिकांच्या पंचनाम्याची क्रांतीसेनेची मागणी
राहुरी : तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, बियाण्यासाठी सोडलेल्या घास पिकाचे बियाणे काढणीपुर्वीच मोड फुटल्याने पूर्णतः निकामी झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई- निवेदन पाठवून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील ५ ते ६ दिवसांपासून संततधार अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घास पिक बियाण्यासाठी सोडले होते. यासाठी अळी, मावा, तुडतुडे व फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक औषधांची फवारणी केली. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च आला आहे. मात्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने बियाण्याला काढणीपूर्वीच मोड फुटून ती बियाणे पूर्णतः निकामी झाली आहेत.
परिणामी, या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.राज्य सरकारकडून मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर पंचायत समिती व महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
गावातील तलाठी यांना याबाबत कळवले असता, त्यांच्याकडे अशा प्रकारचे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी आपले सरकार हे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तालुक्यातील कोंढवड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीसह अवेळी पडणाऱ्या पावसाच्या आपत्तीमुळे बाधित झालेल्या चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यास राज्य सरकार नेहमीच प्राधान्य देईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.