Nishikant Dube : युद्ध जिंकलं भारतानं, जमीन दिली पाकिस्तानला!

निशिकांत दुबेंचा काँग्रेसवर जबरदस्त प्रहार


आज आपण एका अशा राजकीय वादावर चर्चा करणार आहोत, ज्याने भारताच्या संसदेपासून ते सोशल मीडियापर्यंत खळबळ उडवलीय. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९६५च्या युद्धात विजय मिळवूनही गुजरातमधील रण ऑफ कच्छचा ८२८चौरस किलोमीटरचा भूभाग पाकिस्तानला दिला, असा दावा केलाय. या दाव्याने काँग्रेस आणि भाजपामध्ये नवा वाद उफाळलाय. चला, या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया या लेखातून...



रण ऑफ कच्छ हा वाद महत्त्वाचा


भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर जणू हल्लेच सुरू केले आहेत. भाजपाच्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. १९६५चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतरचा रण ऑफ कच्छ हा वाद भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गुजरातमधील रण ऑफ कच्छ हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चाललेला भौगोलिक वादाचा भाग. युद्धानंतर हा वाद आंतरराष्ट्रीय लवादाकडे गेला आणि १९६८ मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने ८२८ चौरस किलोमीटर जमीन पाकिस्तानला दिली, असा दावा निशिकांत दुबे यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एका कथित दस्तऐवजाची प्रतही शेअर केली. त्यामुळे हा वाद अधिकच वाढलाय.


आर्यन लेडी असलेल्या इंदिरा गांधी यांनी संसदेत आपली ताकद दाखवत विरोध मोडून काढला आणि पाकिस्तानाला कच्छमधील जमीन देण्याचा निर्णय घेतला, असा दावा निशिकांत दुबे यांनी केलाय. इतकंच नव्हे तर पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोपही दुबे यांनी केलाय.


आता पाहूयात १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर काय घडलं ते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर रण ऑफ कच्छ वादाला तोंड फुटलं. गुजरातमधील रण ऑफ कच्छ हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावादाचा प्रश्न निर्माण झाला. युद्धानंतर हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय लवादाला मान्यता दिली. १९६५ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली कराराची प्रक्रिया सुरू झाली. १९६८ मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने लवादाच्या निर्णयानुसार ८२८ चौरस किलोमीटर जमीन पाकिस्तानला दिली. लवादाने एकूण वादग्रस्त ९,००० चौरस किलोमीटरपैकी १० टक्के म्हणजेच सुमारे ८२८चौरस किलोमीटर जागा पाकिस्तानला दिली. भारताला उर्वरित ९० टक्के भूभाग मिळाला.


भाजपाच्या निशिकांत दुबे यांनी काँग्रेसला पाकिस्तान आणि बांगलादेश वोट बँक हवी आहे, असाही आरोप केला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने निशिकांत दुबेंवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर निशाणा साधला. तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी चंद्रशेखर सरकारचा दाखला देत निशिकांत दुबेंचा दावा खोटा असल्याचा दावा केलाय. हा वाद केवळ ऐतिहासिक घटनांपुरता मर्यादित नाही, तर त्यात आजचा राजकीय हेतू, इच्छा आणि रणनीतीचा भाग आहे. निशिकांत दुबे हे भाजपाचे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही सुप्रीम कोर्ट, वक्फ कायद्यापासून ते राहुल गांधींवर थेट हल्ले केले आहेत. यावेळी त्यांचा इंदिरा गांधींवरचा हल्ला हा काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.



भारत - पाकिस्तान युद्धानंतर काँग्रेस - भाजपामध्ये रंगलेला हा वाद आगामी निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा आहे. १९६८ च्या रण ऑफ कच्छ समझोत्याला आंतरराष्ट्रीय लवादाचा आधार होता, मात्र त्यावेळी जनसंघाने आणि आताच्या भाजपाचा संसदेत तीव्र विरोध केला होता, हे खरं आहे. पण आज हा मुद्दा पुन्हा का उचलला गेला? यामागे २०२५ मधील बदलत्या राजकीय समीकरणांचा हात आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

IValue Info Solutions Limited कंपनीचा IPO आजपासून बाजारात दाखल पहिल्या दिवशी कंपनीला किरकोळ प्रतिसाद 'या' सबस्क्रिप्शनसह

प्रतिनिधी:आजपासून आयव्हॅल्यु इन्फो सोल्युशन्स लिमिटेड (Ivalue Info Solutions Limited) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला

प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: 'दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम' हीच उपमा आयटी शेअर्सच्या तेजीने केली सिद्ध शेअर बाजारात वाढ कायम !

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीने झालेली आहे. दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम !

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

पुनावाला फिनकॉर्पचे शेअर आज तुफान उसळले १५% वाढत इंट्राडे अप्पर सर्किटवर 'या' कारणामुळे

मोहित सोमण:आज पुनावाला फिनकॉर्प (Poonawala Finance Limited) कंपनीचा शेअर १५% पर्यंत उसळला होता. दुपारी ३.०७ वाजेपर्यंत कंपनीचा

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल