सिंधुदुर्ग : दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र देण्यासोबत शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. या सकारात्मक निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील २ हजारहून अधिक दशावतारांना होणार आहे. दशावतारांच्या विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात राणे यांनी सांस्कृतिक मंत्री शेलार यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या त्या नुसार आमदार निलेश राणे यांनी गेल्या अधिवेशनात दशावतारी कलाकारांच्या विविध मागण्या बाबत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांनतर आज आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक संपन्न झाली.
यावेळी सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद व्हावी, त्याचप्रमाणे या कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाच्या मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी, सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घ्यावे, तसेच वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनांमध्ये सुद्धा दशावतारी कलाकारांचा अधिकचा वाटा मिळावा यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली.
यावेळी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असून माझ्या जिल्ह्यातील दशावतारी कलेला राजाश्रय मिळण्याबरोबरच कलाकारांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका घेत आमदार निलेश राणे यांनी केलेल्या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्रालयाने ताबडतोब दखल घेऊन कलाकारांची जिल्हास्तरावर नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा पायलेट प्रोजेक्ट सिंधुदुर्ग पासून सुरुवात करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.
त्याचप्रमाणे याबाबत शासन निर्णयामध्ये देखील सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार दशावतारी कलाकार व सदस्य यांची नेमणूक करण्याच्या सूचना देखील मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात दशावतारी कलेबरोबरच कलाकारांना देखील राजश्रय मिळण्याचा राजमार्ग अखेर खुला झाला आहे.