
राजकीय संकटामुळे आणि देशातील पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे राजीनामा देण्याचा विचार करत आहे, असा विचार मुहम्मद युनुस यांनी बोलून दाखवला. नॅशनल सिटीझन्स पार्टी अर्थात एनसीपीचे प्रमुख नाहिद इस्लाम यांनी बीबीसी बांगलाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मागील काही दिवसांपासून युनुस यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नाहिद इस्लाम आणि युनुस यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीत युनुस यांनी राजीनाम्याचा विचार बोलून दाखवल्याचे नाहिद इस्लाम यांनी बीबीसी बांगलाला सांगितले. काम करणे कठीण झाल्याची कबुली मुहम्मद युनुस यांनी दिल्याचेही नाहिद इस्लाम म्हणाले.
देशात सुरू असलेल्या राजकीय अडचणींमुळे आणि पक्षांमधील संवादाच्या अभावामुळे सरकारला काम करणे कठीण झाल्याचे मुहम्मद युनुस म्हणाले. राजकीय पाठिंबाच नसेल तर पदावर राहून काहीच करता येणार असे सांगत मुहम्मद युनुस यांनी राजीनाम्याचा विचार बोलून दाखवल्याचे नाहिद इस्लाम म्हणाले.
बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी मुहम्मद युनुस यांनी लवकर देशात सार्वत्रिक निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. लष्करी बाबींमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे आणि प्रस्तावित राखीन कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लष्कराला माहिती द्यावी असेही लष्करप्रमुख म्हणाले.
गेल्या वर्षी शेख हसीनांच्या अवामी लीग सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पायउतार व्हावे लागले होते. आंदोलनादरम्यान लष्कराने आंदोलकांवर कारवाई करण्यास नकार दिला होता. पुढे हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, मुहम्मद युनुस यांची काळजीवाहू अर्थात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. बांगलादेशमधील ग्रामीण बँकेचे संस्थापक प्रमुख म्हणून काम केलेल्या मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात देशातील परिस्थिती सुधारेल, अशी आशा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन्स पार्टी अर्थात एनसीपीला वाटत होती. प्रत्यक्षात एनसीपीची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही.