पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुनर्विकसित १०३ स्थानकांचे उद्घाटन

बिकानेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिकानेरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एकाचवेळी देशातील पुनर्विकसित केलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८६ जिल्ह्यांमध्ये ही १०३ रेल्वे स्थानके आहेत. यात महाराष्ट्रातील पंधरा स्थानके आहेत.



अमृत भारत योजनेंतर्गत महाराष्ट्रातील आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड व वडाळा रोड या स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुनर्विकसित केलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील मुंबईच्या परळ स्थानकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अमृत भारत योजनेतील कामाचे कौतुक केले. तसेच या योजनेसाठी पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

सरकारने राबवलेल्या अमृत भारत योजनेत रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला. प्रवाशांकरिता सुखसोयींची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागाचे रुपडे पालटताना स्थानिक भागात कोणत्या संस्कृतीचा अथवा परंपरेचा प्रभाव आहे का याचा प्रधान्याने विचार करण्यात आला. रेल्वे स्थानकात प्रवाशांना विविध प्रकारची माहिती देण्यासाठी सहज दिसतील आणि पटकन वाचून समजतील असे डिस्प्ले बोर्ड आणि इंडिकेटर ठिकठिकाणी बसवण्यावर भर देण्यात आला. स्थानकात येण्याजाण्याचे मार्ग तसेच स्थानकातील जिने - पादचारी पूल, लिफ्ट, एस्कलेटर हे सर्व प्रशस्त करुन प्रवाशांची सोय करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठीची स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही, सार्वजनिक घोषणा प्रणाली या सर्व व्यवस्थांचे आधुनिकीकरण करण्यात आले. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी स्थानकावर ठिकठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकाजवळ प्रशस्त वाहन तळ उभारण्यात आले. प्रचंड गर्दीच्या स्थानकांवर फूड कोर्ट, किओस्क, रिटेल आऊटलेटची विशेष व्यवस्था करण्यात आली. लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या स्थानकांवर थांबतात तिथे प्रतीक्षालय, बसण्याची प्रशस्त जागा, प्रकाशयोजना, वायुवीजन, स्वच्छता यावर प्रचंड भर देण्यात आला आहे.

केंद्र सरकार अमृत भारत योजनेत देशातील १३०० पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करत आहे. याच योजनेंतर्गत १०३ स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम करण्यात आले आहे. या स्थानकांचे एकाचवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.

अमृत भारत योजनेअंतर्गत प्रादेशिक वास्तुकला प्रतिबिंबित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी डिझाइन केलेल्या १,३०० हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास आधुनिक सुविधांसह केला जात आहे. करणी माता मंदिरात येणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांना सेवा देणारे देशनोके रेल्वे स्थानक मंदिर वास्तुकला आणि कमान आणि स्तंभ थीमने प्रेरित आहे. तेलंगणातील बेगमपेट रेल्वे स्थानक काकतिया साम्राज्याच्या स्थापत्यकलेपासून प्रेरित आहे. बिहारमधील थावे स्थानकात ५२ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माँ थवेवलीचे प्रतिनिधित्व करणारे आणि मधुबनी चित्रांचे चित्रण करणारे विविध भित्तिचित्रे आणि कलाकृतींचा समावेश आहे. गुजरातमधील डाकोर स्थानक रणछोदराई जी महाराजांपासून प्रेरित आहे. भारतातील पुनर्विकसित अमृत स्थानकांमध्ये सांस्कृतिक वारसा, दिव्यांगजनांसाठी असलेल्या प्रवाशां-केंद्रित सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा आणि प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी शाश्वत पद्धतींचा समावेश आहे.
Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत