अवकाळी पावसाचा फटका; जिल्ह्यात १६४९ घरांची पडझड

सुक्या मासळीचे ८० लाखांचे नुकसान


पालघर : जिल्ह्यात सतत तीन दिवस झालेल्या वादळी वारा व पावसामुळे आठ तालुक्यात १ हजार ६४९ घरांचे नुकसान झाले आहे. पालघर आणि डहाणू तालुक्यातील घरांची जास्त पडझड झाली आहे. पालघर तालुक्यात ४७८ तर डहाणू तालुक्यातील ४६६ घरांचे नुकसान झाले आहे. धाकटी डहाणू येथे वादळामुळे तसेच बोटी एकमेकांना धडकल्याने ९३ बोटीचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार नुकसानीचे पंचनामे सर्वत्र करण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वादळी वारा व पावसाने हजेरी लावली. बुधवार आणि गुरुवारी सुद्धा पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडल्याने जिल्ह्यातील बहुतांश भाग अंधारात होता. ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्यााने वाहनधाकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला.वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली असून जिल्ह्यात १ हजार ६४९ घरांचे नुकसान झाले आहे.


वाडा तालुक्यातील ९२ घरांचे नुकसान झाले असून, वसई तालुक्यात ८७ जव्हार तालुक्यातील १०७ मोखाडा तालुक्यातील १४७ पालघर तालुक्यातील ४७८, डहाणू तालुक्यातील ४६६, विक्रमगड तालुक्यातील १९६ आणि तलासरी तालुक्यातील ७६ घरांचे नुकसान झालेले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे ९६ बोटींचे नुकसान झाले असून, डहाणू येथील ९३, पालघर मधील २ आणि वाडा तालुक्यात एका बोटीचे नुकसान झाले आहे. अर्नाळा येथील ३५० महिलांच्या सुक्या माशांचे जवळपास ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती मत्स्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्वच तालुक्यात महसूल विभागाच्या पथकाकडून तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाकडून सर्व्हे करण्यात येत आहेत. प्राथमिक सर्वेनुसार नुकसानीची माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आली आहे.


खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची मागणी


मच्छीमार बांधवांच्या बोटींचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. अनेक मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान झाले असून अर्नाळा येथील मच्छीमार महिलांच्या सुक्या मासळीचे एक कोटींहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वादळीवारामुळे नुकसान झालेल्या बोट मालकांना देण्यात येणारी नुकसान भरपाई पाहता बोट मालकांचे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे शासनाने "तौक्ते" चक्रीवादळाच्या धर्तीवर या बोट मालकांना विशेष पॅकेज म्हणून मदत द्यावी तसेच घर आणि शेती पिकाचे नुकसान झालेल्या नागरिक शेतकऱ्यांनाही त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


१ व्यक्ती, ४ जनावरांचा मृत्यू पालघर तालुक्यातील वेढी येथील रहिवासी मोरेश्वर सिताराम लोहार हे बकऱ्या चारण्याकरिता गेले होते. मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजांच्या तारा रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. सिताराम लोहार हे घरी परतत असताना रस्त्यावर पडलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेत एका बकरीचा ही मृत्यू झाला आहे. तसेच शॉक लागून विक्रमगड तालुक्यात एका बैलाचा आणि वीज पडून जव्हार तालुक्यात २ गाईंचा मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या