Sunday, May 18, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर
श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. सलग चौथ्या रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. पाकिस्तानला सलग चौथ्या रात्री भारताने चोख प्रत्युत्तर दिले.



संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, २७-२८ एप्रिलच्या रात्री कुपवाडा आणि पुंछ या दोन जिल्ह्यांना लक्ष्य करुन नियंत्रण रेषेच्या पलिकडून पाकिस्तानच्या लष्कराच्या चौक्यांनी लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे भारतात जीवितहानी झालेली नाही; असेही प्रवक्त्याने सांगितले.



पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन सुरक्षा पथकाने हल्लेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. ही कावाई सुरू असतानाच भारताने पाकिस्तान विरोधात इतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत. सार्क सवलतीत भारतात आलेल्यांचे व्हिसा पण रद्द करण्यात आले आहेत. फक्त हिंदू असलेल्या पाकिस्तानमधील नागरिकांना अपवाद म्हणून कागदपत्रे सादर करुन परवानगी घेऊन भारतात राहण्याची सवलत देण्यात आली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या ५५ वरुन ३० वर आणण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण दलांच्या दुतावासातील प्रतिनिधींना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे. जमिनीवरुन सुरू असलेला भारत - पाकिस्तान प्रवास बंद करण्यात आला आहे.

पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी, त्यांचे मदतनीस आणि पडद्यामागचे सर्व सूत्रधार यांना शोधून कल्पनाही करता येणार नाही, अशी कठोर शिक्षा देऊ असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. ही घोषणा होताच अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने १९७२ चा सिमला करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे. भारतावर अणुबॉम्ब टाकू अशीही धमकी पाकिस्तानच्या काही नेत्यांनी दिली आहे. तर भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. पाकिस्तानसाठी अतिरेकी कारवाया करणाऱ्या काही जणांची घरं नष्ट करण्यात आली आहेत. यावेळी भारताने अतिरेकी, त्यांचे मदतनीस आणि पडद्यामागचे सूत्रधार या सर्वांविरुद्ध कठोर पवित्रा घेतला आहे.
Comments
Add Comment