मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात लढला. शिवाजी नावाचा विचार त्याला संपवायचा होता. जगभरात औरंजेबाचा इतिहास अभ्यास केला जातो. मराठ्यांना गाडायला आलेल्या औरंगजेबाला (Aurangzeb) आम्ही (मराठ्यांनी) गाडले असा फलक औरंगजेबाच्या सजलेल्या कबरीजवळ लावावा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. यावेळी एकजुटीने मराठीचा नारा द्या, असेही आवाहन त्यांनी दिले.
मराठीच नाही बोललात तर कानफटीतच बसणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मेळावा गुढी पाडवा (Gudi Padwa 2025) मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केले .त्यावेळी त्यांनी मराठीच्या मुदद्यांवर अधिक भर दिला. मराठी बोलणार नाही असे म्हणाल तर कानाखाली बसणारच, असा राज ठाकरे यांनी परभाषिकांना इशारा दिला. ते म्हणाले, प्रत्येक बँकेत आणि आस्थापनेत मराठी पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन मराठी वापरतात का, ते चेक करा. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील उतारा वाचून दाखविला. महाराष्ट्रातील मराठा लोकांनी आत्मस्वरुप पाहावे, असे सांगत राज ठाकरे यांनी जनतेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. एकजुटीने मराठीचा नारा द्यावा, अशी शपथ घ्यावी, असे राज ठाकरे यांनी आवाहन केले.
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत
मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यावर (Maha Kumbhmela) टीका केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेल्या वादावरही भाष्य केलं. तसेच चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत,असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं होते. त्यावर राज ठाकरे म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं प्रयत्न सुरू आहेत. फक्त माथी भडकविण्याचं काम सुरू आहे. अफजल खानचा वकील हा ब्राम्हण होता. स्वराज्यावर चालून आलेले मिर्झाराजे हेदेखील हिंदूच होते. औरंजेबाच्या मुलाला संभाजीराजेंनी आश्रय दिला. औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात लढला. तो कशामुळे ठाण मांडून होता? कारण, शिवाजी नावाचा विचार त्याला संपवायचा होता. जगभरात औरंजेबाचा इतिहास अभ्यास केला जातो. मराठ्यांना गाडायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही गाडले असा फलक औरंगजेबाच्या सजलेल्या कबरीजवळ लावावा. ज्यांना गाडलयं, त्याची प्रतिके नेस्तनाबूत करू नये, असे सांगत राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) कायम ठेवावी, अशी भूमिका मांडली.
सध्या परिस्थितीत मूळ विषयांकडे कोणाचंही लक्षच नाही. सर्व विषय भरकटले जातात. आम्हाला जंगलाचं पडलेलं नाही, पाण्याचं पडलेलं नाही. आम्हाला फक्त पडलेलं आहे औरंगजेबाचं. तो बसलाय द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की पाडली पाहिजे? हे विषय आत्ताच कसे आले? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाहीत. चित्रपट उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं का? अक्षय खन्ना चित्रपटात औरंगजेब बनून आल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला का? हॉट्सअॅपवर तुम्हाला इतिहास कळत नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचायला लागतात. आता इतिहासावर कोणीही बोलायला लागलं आहे. विधानसभेतही औरंगजेबावर बोलतात”, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीका केली आहे.
नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे
“गेल्या काही दिवसांत काही घटना घडल्या. त्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी कुंभमेळाव्यावर बोललो, तर काही हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशात नद्यांची जी भीषण अवस्था आहे, आपण नद्यांना माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे, असे म्हणत व्यासपीठावर एक क्लिप दाखवत गंगेतील प्रदुषणाचे व्हिडीओ दाखवला.