ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात भाविकांची मांदियाळी
देहू : देहूनगरीत आज जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरामधून लाखो भाविक (Dehu Tukaram Beej Sohla) देहूत दाखल झाले आहेत. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबाचा जप करीत राज्यभरातून अनेक दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदीचा काठ वारक-यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
PAK vs NZ : न्यूझीलंडच्या टिम रॉबिन्सनने घेतला अफलातून झेल; व्हिडिओ व्हायरल!
दरम्यान, बीज सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असून ७५व्या बीज सोहळ्यानिमित्त एकनाथ शिंदे यांचे देहून संस्थानाकडून गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना संत तुकाराम महाराज पुरस्काराने स्नमानित करण्यात आले आहे.
नगरपंचायत प्रशासनाकडून विविध कामांचे आयोजन
बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासनाकडून विविध कामे करण्यात आली असून पाणीपुरवठा स्वच्छतासाठी सज्ज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गाथा मंदिर, मुख्यमंदीर, वैकुंठस्थान मंदिर, मुख्य कमान, बीएससी केंद्रामध्ये बाह्य रुग्ण तपासणी केंद्र उभारण्यात आले असून मुबलक औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर लाखो वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य मंदिर वैकुंठ गमन स्थान मंदिर परिसर, तसेच नगरपंचायत प्रशासनाकडून सुमारे ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. देहूमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मार्ग बीज सोहळ्यासाठी बॅरिकेटिंग उभारून बंद करण्यात आले आहेत.
पदपथ, रस्त्यांवर व्यवसायास बंदी
देहूनगरीत सोहळ्यानिमित्त पदपथावर तसेच रस्त्यांवर फळे, फुल विक्रेते, खेळणी व इतर साहित्य, खाद्यपदार्थ विक्रेते हातगाड्या लावून, तसेच रस्त्यांवरील जागा अडवून विक्री व्यवसाय करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन चेंगराचेंगरी घडण्याच्या शक्यता आहे. पाकीट, मोबाईल, दागिन्यांची चोऱ्या घडण्याच्या घटनाही घडतात. यामुळे भाविकांच्या सोयी सुविधा व सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बीज सोहळ्यासाठी दोन दिवसांसाठी पदपथांवर आणि रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे.
तुकाराम बीज काय आहे?
संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचं वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला झालं असं मानलं जातं. संत तुकाराम महाराजांना देव सदेह वैकुंठात घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज म्हटलं जातं. तुकाराम महाराजांचं वैकुंभगमन देहू (पुणे) येथे इ.स. १६४९ मध्ये झाले, असं वारकरी संप्रदाय मानतो. या दिवशी नांदुरकी वृक्ष (देहू येथील एक झाड) दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हलतो, असा भक्तांचा विश्वास आहे. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी पंढरपूरहून आणि इतर गावांमधून मोठ्या संख्येने वारकरी देहू येथे येतात. नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, भजन आणि गाथा पारायणाचे आयोजन होते.