थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघाचा वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा
वाडा : थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघाचा वाडा तहसील कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू केली असून या योजनेकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हजारो नागरिकांना हक्काच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. वाडा तालुका हा ग्रामीण तथा आदिवासी बहुल तालुका असून मोठ्या संख्येने नागरिक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करत असून सदर वाडा तालुक्यातील मजुरांची मजुरी डिसेंबर महिन्यापासून ९,२४,५८,९०५ रुपये एवढी मजूरी थकीत असून शिमगा सण ऐरणीवर असतांना हातावर उपजीविका असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सर्वत्र होळी सण साजरा करण्याच्या तयारीत असताना मजुरांना केलेल्या कामाच्या मजुरीसाठी उन्हा, तान्हात मोर्चा काढावा लागत आहे ही शोकांतिका आहे. वाडा तालुक्याची ६००० मजुरांची थकीत मजुरी डिसेंबर महिन्यापासून ९,२४,५८,९०५ रुपये तात्काळ अदा करण्यात यावी. केंद्र शासनाकडून हमी प्रमाणे १०० दिवस व राज्य शासनाच्या हमी प्रमाणे २६५ दिवस असे ३६५ दिवस काम उपलब्ध करून देण्यात यावे. गाव पाड्यांना रस्ते जोडण्याचे काम मनरेगा मधून होत असून नव्याने रस्त्यांची कामे करण्यासाठी स्थगिती दिल्यामुळे अनेक गाव पाडे रस्त्यांपासून वंचित राहीले आहेत, तसेच अकुशल मजुराच्या हाताचे काम बंद झाले आहे म्हणून तात्काळ रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत.
Holi Special Kokan Train : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आजपासून दादर – रत्नागिरी विशेष गाडी धावणार
ज्या मजुरांनी कामाची मागणी केलेली आहे अशा मजुरांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा. मंजूर वनपट्ट्यावर बांध बंदिस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. या मागण्या घेऊन श्रामजीवी संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सचिव सुरज दळवी, संपर्क प्रमुख रफिक चौधरी, जिल्हा महिला ठिणगी उपप्रमुख रेखा पऱ्हाड, सचिव् आदेश वाघ, चंदर गवते सुजाता पारधी यांच्यासह शेकडो महिला मजूर उपस्थित होत्या.